अभय लांजेवार
उमरेडच्या कान्हवा शिवारात परत एकदा आमनदीच्या चुकीच्या नियोजनाने शेकडो शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली. संततधार पावसात बहरलेली कपाशी, सोयाबीनची शेतं पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्यांचा जगण्याचा आधारच हिरावला.(Crops)
वेकोलि प्रशासनाच्या स्वार्थी धोरणावर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत असून, आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उसनवारी करत, जवळचा पैसा लावून कसेबसे कपाशीची लागवड आणि सोयाबीनची पेरणी त्यांनी उरकवली.
आठवड्यातच पीक बहरले. दोन-चार दिवसांच्या संततधार पावसाने पिकं बुडाली. मागील अनेक वर्षापासूनचा हा गुंता शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजला आहे.
उमरेड तालुक्यातील कान्हवा शिवारातील शेकडो एकरातील पिके क्षणात पाण्याखाली बुडाल्याने या परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
वेकोलि उमरेड उपक्षेत्र प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच बसतो आहे. कोळशाचे उत्पादन वाढविण्यासाठी वारंवार आमनदी वळविल्या गेली.
करोडो रुपयांचा खर्च यावर केला गेला. कळमना आणि कान्हवा नदीचे खोलीकरण करण्यात आले. कान्हवा गावालगत असलेल्या वेकोलि पाणीपुरवठा आणि स्मशानभूमीजवळ 'नाशिक पॅटर्न'चा बांध उभारण्यात आला सोबतच कोळसा खाण येथील लालइमली पुलाजवळही बांधकामाचा घोळ केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
वेकोलि प्रशासनाने आमनदी वळविताना केवळ स्वार्थी भूमिका वठविली. स्वतःचा फायदा करत हित साधले. खोलीकरण, पुलाचे बांधकाम, आमनदी वळवत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्न-उमरेड तालुक्यातील कान्हवा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील झोपडी, त्याचे साहित्य आणि संपूर्ण पीक पाण्याखाली आले. परिसरात अशाच वेदना अन्य शेतकऱ्यांच्या आहेत.
शेतकऱ्यांची व्यथा संपणार कधी ?
'लोकमत'ने अनेकदा या परिसरातील शेतकऱ्यांची ही व्यथा मांडली. डॉ. हरीश भोयर, प्रदीप बुलकुंदे, वासुदेव डांगाले, रिंकेश पाटील, सचिन डांगाले, प्रकाश लोखंडे, अरमान गेडाम, गोपीचंद डांगाले, बन्सी मांडवकर, जागेश्वर भोयर, पुंडलिक डांगाले, वसंता डांगाले, वसंता थुटे, माधो मंदीरकर, अण्णाजी मंदीरकर, राजू थुटे, कवडू गेडाम, लक्ष्मण डाहाके, सूर्यभान डाहाके आदी शेतकऱ्यांची ही व्यथा संपणार तरी कधी, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
समस्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळेच मागील अनेक वर्षापासून कान्हवा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पाऊस आला. शेत बुडाले की शेतकरी ओरडतात. वेकोली अधिकारी मोठ्या मुश्किलीने ऑन दि स्पॉट येतात. थातूरमातूर उत्तरे देतात. कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही.
केवळ आपली तिजोरी भरण्यासाठी वेकोलीने हा संपूर्ण प्रकार केला, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
गटग्रामपंचायत शिरपूर येथील माजी उपसरपंच वीणा मांडवकर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आम्ही कोणत्याही प्रकारची उपाययोजना करू शकत नाही, असा तोरा वेकोली अधिकाऱ्यांनी सुरुवातीला दाखविला. शेतकरी संतापले.
येत्या काही दिवसांत वेकोलिने उपाययोजना केली नाही तर, आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
'एनओसी' कुणी दिली ?
गटग्रामपंचायत शिरपूर येत असल्याने वेकोली प्रशासनाने या परिसरात बहुसंख्य मोठी कामे केली आहेत. या संपूर्ण कामासाठी एनओसी कुणाकडून घेतल्या गेली, याचीही उच्चस्तरीय चौकशी करा, अशीही मागणी केली जात आहे.
लोकप्रतिनिधी कुठे गेले?
उमरेड विधानसभेत नेतृत्व संख्या वाढली आहे. खासदार श्यामकुमार बर्वे यांनीसुद्धा माजी आमदार राजू पारवे यांच्यासह अगदी सकाळीच वेकोलि पटांगणावर योगासने केली. दुसरीकडे माजी आमदार सुधीर पारवे हेसुद्धा शेतशिवारात पोहोचत असतात.
भाजपचे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आनंद राऊत हेसुद्धा शेतकरी नेते आहेत. आमदार संजय मेश्राम विविध प्रश्न विधानसभेत उचलून धरतात. माजी मंत्री राजेंद्र मुळक सुद्धा समस्येसाठी धावत उमरेडला येतात. अशी लांबलचक लोकप्रतिनिधींची यादी या क्षेत्रात असताना मागील अनेक वर्षांपासूनचा शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविण्यात का आला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
या प्रश्नांसाठी कोण पुढे येणार. जनतेच्या प्रश्न, समस्यांसाठी लोकप्रतिनिधी कधी धावणार, अशी विचारणा केली जात आहे.