Agriculture News : जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर ही आधारित आहे. खरीप व रब्बी हंगामातील शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतमजूर व मजुरांच्या हाताला काम नसते. तर यंदा मनरेगाची कामे सुद्धा सुरु झालेली नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजूर वर्ग जिल्ह्याबाहेर व परराज्यात स्थलांतर करीत आहे. अशात तेंदूपत्ता संकलनाने मजुरांना दीड महिन्याचा रोजगार मिळत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत पूर्ण ठरत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रोजगाराची पुरेशी साधन नाहीत. ऋतू मानानुसार मजुरांना सुद्धा रोजगार शोधावा लागतो. उन्हाळ्यामध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम मिळते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास थोडाफार आधार मिळतो. दरवर्षी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात त्यामुळे मजुरांना गाव परिसरातच रोजगार उपलब्ध होतो.
पण यंदा प्रशासनाने मनरेगाच्या कामाचे नियोजन न केल्याने मागील महिनाभरापासून मजुरांच्या हाताला काम नाही. जिल्ह्यातील मजूर दरवर्षी सोयाबीन कापणी, कापूस वेचणीच्या कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. रोवणी सुद्धा करायला महिला मजूर जातात. तर आंध्र प्रदेशात मिरची तोडणीसाठी दरवर्षी जिल्ह्यातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात जातात. या ठिकाणी त्यांना जवळपास दोन महिने रोजगार प्राप्त होतो.
यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मदत होते. मे ते जून महिन्यापर्यंत तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम असतो. यासाठी सुद्धा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर जातात. अर्जुनी मोरगाव तालुक्यासह इतरही तालुक्यातील मजूर वर्ग सध्या तेंदूपत्ता तोडणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याचे चित्र आहे. तेंदूपत्ता संकलासाठी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यात जातो. काही मजूर, मुंसी, ड्रायव्हर, चेकर, मॅनेजर अशा पदाच्या कामासाठी जातात.
रोजगार उपलब्ध करा
गोंदिया जिल्ह्यात उद्योगांचा अभाव असल्याने शेती शिवाय मजुरांना दुसरे काम नाही. त्यामुळे कृषीवर आधारित रोजगार उपलब्ध झाल्यास मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अनेक गावात रोजगार हमी योजनेची कामे बंद
मजुरांच्या हाताला काम नाही
यावर्षी परिसरातील अनेक गावात रोजगार हमीच्या कामांना अद्याप सुरुवात झाली नाही. रोजगार सेवक व पंचायत समितीने कामाचा आढावा घेतला नाही, कामे काढलीच नाही. परिणामी मजुरांच्या हाताला काम नसल्याने मजुरांचे स्थलांतरण होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येकच लघु उद्योग व कुटीर उद्योग गावात लघु किंवा कुटीर उद्योग चालत नाही, अनेक लघु उद्योग बंद पडले, बांबू कामाचा पत्ता कट झाला आहे. मोहफुलांची बंदी, पळसाच्या बियाणे, टोरी संकलन असे अनेक उद्योग अनेक दिवसांपासून बंद आहेत.
PM Kisan Scheme : नवीन शेती घेतली आहे तर पीएम किसान योजनेचे २ हजार रुपये मिळतील का?
