गडचिरोली : शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने 'शेतीसाठी तारेची जाळी (कुंपण) अनुदान योजना' सुरू केली आहे.
ही योजना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना तारेच्या जाळीच्या खर्चावर ८५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. पात्रता, अटी आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा कृषी विभाग कार्यालय येथे उपलब्ध आहेत, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.
अशी आहे योजना
शेतीसाठी तारेची जाळी योजनेवर ८५ टक्के अनुदान किंवा ७ हजार २३५ प्रति क्विंटल, कमाल २१ हजार ६७५ रुपये ३ क्विंटलपर्यंत ज्या रकमेची किंमत कमी असेल ती मिळेल. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, विशेषतः अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे रानटी प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान केले जाते. सदर नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर जाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
