गोविंद शिंदे
नांदेड जिल्ह्यातील दहिकळंबा या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास अखेर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत पोहोचला आणि हा प्रवास सोपा नव्हता.(Success Story)
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या देविदास बापूराव शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि सततच्या संघर्षावर मात करत आपले स्वप्न साकार केले आहे.(Success Story)
लहानपणापासूनच संघर्षाची सुरुवात
देविदास यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, दहिकळंबा येथे झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लहान वयातच शेतीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.
'शाळा कमी आणि काम जास्त' अशा परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवली.
माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना दररोज पाच किलोमीटर अंतर पायी चालत चिखली येथे जावे लागायचे. सायकलसारखी साधी सुविधा देखील उपलब्ध नव्हती पण जिद्द मात्र प्रचंड होती.
शिक्षणासोबत संघर्ष
पुढे त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. २०१६ मध्ये पोलीस भरतीची आवड निर्माण झाली, पण आर्थिक परिस्थितीमुळे २०१७ मध्ये हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी स्वीकारावी लागली.
रात्रपाळी अन् दिवसभर अभ्यास
रात्रभर नोकरी आणि दिवसभर अभ्यास हा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला. ट्युशन, लायब्ररी आणि स्वतः चा अभ्यास असा तगडा शेड्यूल त्यांनी पाळला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही.
प्रवास आणि चिकाटी
गावाहून नांदेडपर्यंत दररोज दीड तासाचा प्रवास करून त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. या अथक मेहनतीचे फळ २०१८ मध्ये मिळाले. ते नागपूर येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवडले गेले.
'अधिकारी व्हायचे' स्वप्न कायम
कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असतानाही त्यांनी मोठे स्वप्न पाहणे थांबवले नाही. 'अधिकारी व्हायचे' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून २०२१ मध्ये त्यांनी एमपीएससी (MPSC) ची तयारी सुरू केली.
वैयक्तिक आयुष्य आणि साथ
२०२२ मध्ये त्यांचा विवाह झाला. पण वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे अभ्यासात खंड पडू दिला नाही. त्यांच्या या यशामध्ये पत्नी अंकिता यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अखेर पीएसआय पदावर निवड
अखंड मेहनत, त्याग, जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा या सगळ्यांच्या जोरावर ३० एप्रिल २०२६ रोजी देविदास शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली.
ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणा
देविदास शिंदे यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
'परिस्थिती कशीही असो, जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते,' हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
ही कथा केवळ यशाची नाही, तर संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची आहे. जी प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला नवी उर्जा देणारी आहे.
