नाशिक : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान -अन्नधान्य पिके व गळीत धान्य सन २०२६-२७ साठी बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी) यंत्रासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्ह्यात सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद व कापूस ही पिके प्रामुख्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या पिकांची लागवड करताना बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी) पद्धतीचा अवलंब केल्यास बियाणे, खते आदी निविष्ठांच्या खर्चामध्ये सुमारे २० ते २५ टक्के बचत होते.
तसेच पिकांची आंतरमशागत व फवारणी करणे सुलभ होते. अधिक पर्जन्यमान झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते व पिकांना आवश्यक हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध झाल्याने उत्पादनामध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत मिळते.
सन २०२६ मध्ये अल-निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाचे उशिरा आगमन तसेच पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपाययोजना म्हणून बी.बी.एफ. तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पावसातील खंडाच्या कालावधीत पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.
राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी बी.बी.एफ. पद्धतीचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घटकासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महसूल नोंदीतून जमीन कमी दाखवली, चुकीची मोजणी झाली, अशावेळी तक्रार कुठे करायची?
