भंडारा : शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाची 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजना राबविण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून हजारो शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. मात्र, अजूनही असंख्य शेतकरी या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
भंडारा जिल्ह्याचे उदाहरण घेतले तर दुसरीकडे, जिल्ह्यात ६ हजार १७९ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ४ हजार ४० शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी आवश्यक रक्कम भरली आहे. त्यामुळे योजनेचा विस्तार होत असला तरी लाभमिळण्याच्या प्रक्रियेत अडथळे कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
वनहक्क कायद्यानुसार गत अनेक दशकांपासून वन जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे अद्याप अधिकृत सातबारा उतारा नसल्याने त्यांना सौर कृषिपंप योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येत आहे. शासनाच्या निकषांनुसार सातबारा आवश्यक असल्याने अनेकांना योजनेबाहेर राहावे लागत आहे.
शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ द्या
सातबारा ऐवजी वनहक्क दावे, वनविभागाची कागदपत्रे किंवा इतर अधिकृत पुरावे ग्राह्य धरावेत. तसेच केवळ सौर पंपच नव्हे तर बी-बियाणे, खते, इतर कृषी अनुदान योजना, पीकविमा आणि सिंचनसंबंधी लाभही त्यांना सहज उपलब्ध करून द्यावेत. जिल्ह्यातील वनक्षेत्र आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्याची मागणी आहे.
आम्ही अनेक दशकांपासून वन जमिनीवर शेती करतो. सातबारा नाही म्हणून आम्हाला डावलणे अन्यायकारक आहे. सौर पंप मिळाला तर सिंचन सुलभ होऊन उत्पादन वाढेल. प्रशासन आणि महावितरणने वनहक्कधारक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र, सुलभकार्यपद्धती तयार करावी.
- भीमराव मेश्राम, शेतकरी.
