जळगाव : पंतप्रधान किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नव्याने सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिले जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे अनेक वंचित असलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा हजार रुपये, असे १२ हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात दिले जातात. पण या योजनेच्या लाभापासून विविध कारणांनी काही शेतकरी अद्यापही वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशाने शासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे.
कागदपत्रातील त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना, शेतीचा वारसा बदलणे, शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मालकी बदलणे, अशा विविध कारणाने वंचित असलेल्या शेतकऱ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
या योजनेंतर्गत लहान शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदीमध्ये नोंदविलेले असावे तसेच आधार कार्ड, बँक आणि मोबाइल क्रमांक जोडलेले असावेत. या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अर्जी करता येणार आहे.
नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज
योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/homenew.aspx यावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. नवीन शेतकरी हा पर्याय निवडावा, राज्य, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक नोंदवावा, ओटीपी नोंदवावा, शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती, जमिनीची माहिती, बँक खाते क्रमांकाची माहिती भरून अर्ज सबमिट करावे.
