हिंगोली : राज्य शासनाच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम किसान'चा हप्ता मिळाल्यानंतर आता राज्याच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.
केंद्र शासन पीएम किसान सन्मान निधी योजना राबवीत आहे. त्यासोबतच राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. अडचणीच्या काळात दोन योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे.
योजनेचा सातवा हप्ता काही महिन्यांपूर्वी वितरित झाला होता. आता आठवा हप्ता जमा होण्याची वेळ झाली असली, तरी अद्याप ही रक्कम जमा झाली नाही. यामुळे हप्त्याची नेमकी तारीख काय, हे जाणून घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने बँका आणि कृषी कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामुळे आचारसंहिता लागू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही योजना जुनीच असल्याने आणि त्याचे लाभार्थी आधीच निश्चित असल्याने, हप्ता वितरणासाठी आचारसंहितेचा तांत्रिक अडसर येणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
'पीएम किसान'च्या हप्त्यासोबत मिळणार का?
केंद्र सरकारच्या 'पीएम किसान'चा २१ वा हप्ता गेल्या महिन्यातच वितरित झाला आहे. सहसा राज्य सरकार केंद्राच्या हप्त्यानंतर १५ ते २० दिवसांत आपला हप्ता जमा करते. यावेळी मात्र थोडा विलंब झाला असून, केंद्राच्या पुढील हप्त्याऐवजी हा स्वतंत्रपणे किंवा लवकरच वितरित होण्याची चिन्हे आहेत.
जि.प. निवडणुकीच्या आधी हप्ता जमा होणार का?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी हा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसे झाले तर जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकतो.
Tur Market : तीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यात तुरीचे दर कसे होते, येत्या फेब्रुवारीत दर कसे राहतील?
