नाशिक : वातावरणात सतत होणारा बदल, दिवसागणिक खते, कीटकनाशके, मजुरीच्या वाढत्या दराने यंदा रब्बीचे गणित बिघडवले आहे. येवला तालुक्यात रब्बी हंगामाची पेरणी सुरू असताना कांद्याची लागवडीत गतवर्षीच्या तुलनेत कमालीची घट झाली आहे.
शेतकऱ्यांचे सर्व गणित कोलमडल्याने कांदा उत्पादक हतबल झाले आहेत. त्यामुळे तब्बल २०.८८२ हजार हेक्टरवर कांदा लागवडीचे उद्दिष्ट असताना १५ हजार ६९६ हेक्टर कांदा लागवड आतापर्यंत झाली आहे. तालुक्यातील रब्बी पिकांच्या क्षेत्रफळाचा आढावा घेतला असता ज्वारी, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांची पेरणी अपेक्षेपेक्षा खूपच कमी तर गहू, मका, या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे.
असे आहे लागवड क्षेत्र
डाळिंब - १४४ हेक्टर, आंबा - ४०.७० हेक्टर, सीताफळ - ४०.२० हेक्टर, द्राक्ष - ५२५.५७ हेक्टर, ड्रॅगन फ्रुट - ११.७० हेक्टर, केळी - १३.०० हेक्टर, पेरू - ३३.७१ हेक्टर, मोसंबी - १२.१० हेक्टर, भाजीपाला - १०८ हेक्टर
पीक उद्दिष्ट (हेक्टर) प्रत्यक्ष पेरणी (हे)
- रब्बी ज्वारी २२८.६० ८६.००
- गहू ६१०२.२० ७४०६. ००
- मका १४६२.२० ५८४१. ००
- हरभरा ३४९७.५० २३६३.००
- उन्हाळ कांदा २०८९१.६७ १४८५२.००
हवामानामुळे शेती जोखमीची
कांदा, गहू आणि हरभरा या सगळ्याच पिकांवर मावा रोग पडला आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे शेती अधिकच जोखमीची बनत असून, पुढील काही दिवस हवामान असेच राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.
सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रब्बी हंगामातील पिकांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे.
- शुभम बेरड, कृषी अधिकारी, येवला
