बाबू खामकर
शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा पावसाळा एक दिलासा घेऊन आला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत (NREGA) मंजूर झालेल्या सिंचन विहिरींमध्ये जून महिन्यातच भरपूर पाणी साठले असून, अनेक विहिरींमधून पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळत आहे. (NREGA Sinchan Vihira)
पाथरुड रोजगार हमी योजनेतून (NREGA) पंचायत समिती कार्यालयांतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येत आहे. त्यातच यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस झाल्याने पाथरूडसह परिसरातील भागात जून महिन्यातच विहिरी फुल्ल झाल्याने रोहयोतून खोदलेल्या या विहिरींचा शेतकऱ्यांना सध्या प्रत्यक्ष आधार मिळताना दिसत आहे.(NREGA Sinchan Vihira)
भूम तालुक्यात शाश्वत पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नसल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सिंचन विहिरींचाच आधार आहे.(NREGA Sinchan Vihira)
विहीर खोदकाम करण्यासाठी लागणारा खर्च मोठा आहे. परंतु, शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्वी चार लाख तर आता पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांना विहीर खोदण्यास मोठा आधार मिळत आहे.(NREGA Sinchan Vihira)
सन २०२२ ते २०२५ पर्यंत भूम तालुक्यात जवळपास १४०० वर शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या असून, त्यात साडेतीनशेवर विहिरींची कामे पूर्णही झाली आहेत. सध्या आठशेवर कामे प्रगतिपथावर आहेत.(NREGA Sinchan Vihira)
यावर्षी अगदी जूनमध्येच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा मुख्य सिंचन स्रोत असलेल्या सिंचन विहिरी जूनमध्येच पाण्याने भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी रोजगार हमी योजनेचा आधार आणि विहिरीत पाणी येण्यासाठी पावसाची साथ मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.(NREGA Sinchan Vihira)
भूम तालुक्यातील आनंदवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या सिंचन विहिरी जूनमध्येच अशा ओसंडून वाहत आहेत. रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरींमुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा आधार मिळाला असून यंदाच्या हंगामात उत्पादनात मोठी वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे.
पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान
शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्वी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत होते. त्यात आता एक लाख रुपयांची वाढ झाल्याने ही रक्कम पाच लाखांपर्यंत गेली आहे.
सिंचन विहिरींची कामे झाली पूर्ण
सन २०२२ ते २०२५ या कालावधीत भूम पं.स. अंतर्गत ३५० विहिरी पूर्ण झाल्या असून, ८०० पेक्षा अधिक विहिरींची कामे सध्या प्रगतिपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भूम पंचायत समिती नरेगाअंतर्गत देण्यात आलेल्या सिंचन विहिरींचा लाभार्थी शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने जूनमध्येच विहिरींना पाणी आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरींचा मोठा आधार मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही सिंचन विहिरींसह इतरही योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभघ्यावा. - एल. आर. वाजे, गटविकास अधिकारी, भूम.
रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर मंजूर झाल्याने विहीर खोदण्यासाठी मोठा आधार मिळाला. त्यातच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जूनमध्येच विहीर पाण्याने भरल्याने समाधान मिळत आहे. - सागर वनवे, विहीर लाभार्थी, आनंदवाडी
आमच्या गावाला सिंचनासाठी सिंचन विहिरीशिवाय दुसरा मोठा स्रोत नाही. रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाल्याने व त्याचे काम पूर्ण केल्याने यावर्षी जूनमध्येच विहीर पाण्याने फुल्ल झाली आहे. यामुळे अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊन उत्पादनात वाढ होणार आहे. - महादेव घोळवे, विहीर लाभार्थी, आनंदवाडी