जितेंद्र ढवळे
उन्हाळा सुरू झाला की गावागावांत नवीन बोअरवेल खोदण्याची लगबग सुरू होते. मात्र, आता ही पारंपरिक पद्धत बदलण्याची वेळ आली आहे. (Nagpur Water Recharge Model)
नवीन विहिरी खोदण्याऐवजी जुन्याच कोरड्या पडलेल्या विंधन विहिरींना 'फ्लशिंग रिचार्ज' तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा जिवंत करण्याचा अभिनव प्रयोग नागपूर जिल्ह्यात यशस्वी ठरला आहे.(Nagpur Water Recharge Model)
भूजल सर्वेक्षण विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी विकसित केलेला हा 'नागपूर पॅटर्न' राज्यभर राबवला, तर पाणीटंचाईवर मोठा दिलासा मिळू शकतो.(Nagpur Water Recharge Model)
२,६०० पेक्षा अधिक विहिरींचे पुनरुज्जीवन
नागपूर जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक विंधन विहिरी कोरड्या पडल्या होत्या. मात्र, तांत्रिक उपायांचा वापर करून तब्बल २,६१७ विहिरींचे 'फ्लशिंग' करण्यात आले आणि त्यांना पुन्हा पाणी मिळू लागले.
या प्रक्रियेमुळे विहिरींच्या आत साचलेला गाळ आणि अडथळे दूर होतात, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत होतो.
'रिचार्ज शाफ्ट'ची किमया
या प्रकल्पात 'रिचार्ज शाफ्ट' तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. या पद्धतीत पावसाचे पाणी गाळून थेट जमिनीच्या खोल थरांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे भूजल पातळी वाढते आणि विहिरींची साठवण क्षमता सुधारते.
उन्हाळ्यातही पाण्याचा शाश्वत पुरवठा राहण्यासाठी हे तंत्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, हे 'स्मार्ट इंजिनिअरिंग' मॉडेल राज्याच्या जलधोरणात समाविष्ट करणे गरजेचे आहे.
जागतिक स्तरावर मान्यता
या अभिनव उपक्रमाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. नीती आयोग आणि युनिसेफ यांनी या प्रयोगाचे कौतुक केले आहे.
तसेच अभियंता नीलेश मानकर यांना केंद्र सरकारचा 'जल योद्धा' पुरस्कार आणि २०२६ चा 'ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड' मिळाला आहे.
'रूफ टॉप हार्वेस्टिंग'चा यशस्वी प्रयोग
नागपूर जिल्ह्यात पाणी संवर्धनासाठी 'रूफ टॉप हार्वेस्टिंग' संकल्पनाही मोठ्या प्रमाणावर राबवली गेली आहे.
३० ग्रामपंचायती, २० शाळा, २४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५८ अंगणवाड्यांच्या इमारतींवर ही योजना लागू करण्यात आली. एकूण १३२ इमारतींवर सुमारे १४,६९२ चौरस मीटर क्षेत्रावर पडणारे पावसाचे पाणी साठवून जमिनीत मुरवण्यात आले. या उपक्रमातून तब्बल १ कोटी २४ लाख लिटरहून अधिक पाणी भूगर्भात साठवले गेले.
सौर ऊर्जेची जोड
या प्रकल्पाला सौर ऊर्जेची जोड देण्यात आल्याने विजेच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे. त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि किफायतशीर ठरला आहे.
राज्यभर राबवला तर मोठा बदल शक्य
'नागपूर पॅटर्न' राज्यभर राबवला, तर पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.
टँकरवर होणारा हजारो कोटी रुपयांचा खर्च वाचू शकतो
नवीन बोअरवेलमुळे होणारा भूजल उपसा कमी होईल
'रिचार्ज शाफ्ट'मुळे भूजल पातळी नैसर्गिकरीत्या वाढेल
जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनामुळे कमी खर्चात पाण्याचा प्रश्न सुटेल
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागपूरचा 'फ्लशिंग रिचार्ज' मॉडेल प्रभावी पर्याय ठरत आहे. नवीन विहिरी खोदण्याऐवजी उपलब्ध स्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाणी संवर्धनावर भर दिल्यास राज्याला 'टँकरमुक्त' करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. आता गरज आहे ती या यशस्वी प्रयोगाची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याची.
हे ही वाचा सविस्तर :Natural Farming : शेतीत मोठा बदल; नागपुरात 'नैसर्गिक शेती'ची पायाभरणी वेगात
