जब्बार चिनी
अनियमित पावसामुळे शेतीपुढे उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी 'मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजना' शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. (Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana)
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून, वणी तालुक्यात लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
संरक्षित सिंचनासाठी प्रभावी पाऊल
खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास पिकांना मोठा फटका बसतो. अशा परिस्थितीत शेततळ्यात साठवलेले पाणी पिकांच्या ओलितासाठी वापरता येते. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन उत्पादनात स्थैर्य येते.
शासनाने सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने ही योजना गतीने राबविली आहे.
वणीत किती लाभार्थी?
वणी तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जात आहे.
किती मिळणार अनुदान?
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ७५,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम शेततळे खोदकाम आणि संबंधित कामांसाठी वापरता येते.
अर्ज प्रक्रिया कशी?
शेतकऱ्यांनी महाडीबीटी(MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक
लॉटरी पद्धतीने किंवा पात्रतेनुसार लाभार्थी निवड
कृषी विभागाकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतरच कामास सुरुवात
काम पूर्ण झाल्यानंतर जिओ-टॅगिंगद्वारे पडताळणी
या प्रक्रियेनंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.
शेतकऱ्यांना आवाहन
शेततळे हा दुष्काळ आणि अनियमित पावसावर प्रभावी उपाय आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- दिलीप राऊत, तालुका कृषी अधिकारी
शेततळ्यांमुळे पिकांना आवश्यक वेळी पाणीपुरवठा होऊन उत्पादनात वाढ होते आणि शेतीला दीर्घकालीन स्थैर्य मिळते. त्यामुळे शाश्वत शेतीच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जात आहे.
अनियमित पावसाच्या संकटावर मात करत शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे. आगामी काळात अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
