Marathwada Crop Damage : मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा बसला असून, खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे ४ हजार २५१ गावांतील तब्बल १६ लाख ८ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. (Marathwada Crop Damage)
राज्य सरकारकडून नुकसानभरपाईसंदर्भात कोणती घोषणा होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(Marathwada Crop Damage)
नुकसानीचा आढावा
मराठवाड्यातील एकूण ८ हजार ५५० गावांपैकी ४ हजार २५१ गावांतील पिके पूर्णपणे माती झाली आहेत.
सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील १,३७४ गावांना बसला आहे.
खरीप पिकांपैकी जिरायत क्षेत्रातील १५.९७ लाख हेक्टर, बागायतीचे ३,८६१ हेक्टर, तर फळबागांचे ७,०७१ हेक्टर क्षेत्र जलमय झाले आहे.
केवळ तीन दिवसांत २,१०० गावांत पाणीच पाणी झाले असून ५१ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
पावसाचे चित्र
मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण १०३% पर्यंत पोहोचले आहे.
६७९ मिमी सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ७०३ मिमी पाऊस झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, जालना, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यांत सलग पावसामुळे खरीप हंगामावर संकट आहे.
शेतकऱ्यांवर मानसिक ताण
सततच्या अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत मराठवाड्यात ७०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, फक्त जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतच २७० शेतकऱ्यांनी जीवन संपवले.
मुख्यमंत्री आज काय करतील घोषणा?
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ध्वजारोहण करणार आहेत. काल उशिरा रात्री त्यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण माहिती घेतली आहे. आज (१७ सप्टेंबर) ओल्या दुष्काळासंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.”
शेतकऱ्यांसाठी आवाहन
पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनींचा निचरा लवकरात लवकर करावा.
खरीप पिकांमध्ये रोगराई वाढू नये यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी स्थानिक महसूल कार्यालयात पिकांच्या नुकसानीची नोंद त्वरित करावी.
मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या छायेत अडकला असून खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आज कोणती दिलासा देणारी घोषणा करतात, याकडे शेतकऱ्यांची नजर आहे. पुढील काही दिवसात हवामान स्थिर राहणे आणि शासनाची मदत मिळणे, हेच शेतकऱ्यांसाठी आशेचे किरण ठरणार आहेत.