Marathawada Rain : मराठवाड्यात मागील तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचे जोरदार अगमन झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.(Marathawada Rain)
मृग नक्षत्राच्या आगमनासोबतच तिसऱ्या दिवशी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मराठवाड्यात थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत शेतातील मिरची, पपई, मोसंबी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.(Marathawada Rain)
अनेक गावांतील घरांवरील पत्रे उडाले, विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तत्काळ पंचनाम्याची मागणी होत आहे. (Marathawada Rain)
शेतीचे मोठे नुकसान
भोकरदन तालुक्यातील विरेगाव, फत्तेपूर, मासनपूर, लिंगेवाडी, बाभूळगाव, मनापूर, मलकापूर, सिपोरा बाजार, बोरगाव, पेरजापूर, प्रल्हादपूर, सुभानपूर, वाडी, इब्राहिमपूर, मुठाड, मालखेडा, तांदुळवाडी या भागांत मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मल्चिंग पेपरवर लागवड केलेली मिरची वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली असून, फळबागा उन्मळून पडल्या आहेत. तडेगाव परिसरात मोसंबी, आंबा, पपईच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पपईची झाडे जमिनीवर कोसळली असून मोसंबी झाडे मुळासकट उखडली गेली आहेत.
शेतकऱ्यांचा आक्रोश
शेतकरी शंकरदास वैष्णव, केवलदास वैष्णव, देवीलाल पांडे, ज्ञानेश्वर लव्हटे, अशोक लव्हटे आदींनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनाम्याची मागणी केली आहे. नुकसानभरपाई न मिळाल्यास आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे सावट येण्याची भीती व्यक्त होत आहे.
टेंभुर्णीत अंधाराचे साम्राज्य
टेंभुर्णी व परिसरातही वादळी वाऱ्यासह मृग नक्षत्रातील पाऊस झाला. विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र, धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा झाला असून पेरणीच्या कामांना गती मिळाली आहे.
पावसाचा तडाखा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. कोळवाडी येथे भिंत कोसळून एक व्यक्ती ठार झाला. गुदमा येथे शाळेच्या छपराचे ३२ टिनपत्रे उडून पोषण आहार, संगणक व टीव्हीचे नुकसान झाले. पाच शेळ्या ठार झाल्या.
विजेचा प्रश्न गंभीर
कचनेर परिसरात तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. शिऊर परिसरातील २८ गावे २७ तास अंधारात आहेत. वीजतारा व पोल कोसळल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
इतर ठिकाणीही हानी
मनेगावमध्ये धन्वंतरी रुग्णालयाचे छप्पर उडाले, औषध व साहित्याचे नुकसान झाले. वैजापूर तालुक्यात कोळवाडी येथे भिंत कोसळून मासेविक्री करणाऱ्या मच्छीमाराचा मृत्यू झाला. बैल, बकरी, शेळ्यांचा मृत्यू झाल्याचेही समजते आहे.
दावरवाडीत झाड पडून पेव्हर ब्लॉकचे नुकसान झाले. गोकुळवाडीत घरावर पत्रे कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.
शेतकऱ्यांची मागणी
या संपूर्ण परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी सर्वच भागातील शेतकरी करत आहेत.
पुढील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजखांब दुरुस्त करणे, शेतीसाठी आवश्यक सुविधा पुरवणे आणि शाळांसह सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता वाढवणे गरजेचे आहे.