छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनसारखा बरसत आहे. पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर अक्षरशः पाणी फिरवले आहे. (Marathawada Rain)
काही दिवसांपासून विजांचा कडकडाट, ढगफुटीसदृश सरी, आणि पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे जीव गेले, शेतीचे मोठे नुकसान झाले, आणि जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले. धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे पावसाच्या तडाख्याने हादरले आहेत. (Marathawada Rain)
हा पाऊस केवळ हवामानातील चमत्कार नसून, शेतकऱ्यांसाठी आर्थिक आणि मानसिक आघात ठरत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठीही अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. (Marathawada Rain)
मराठवाडा विभागात मागील तीन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्यामुळे ३० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, शेकडो जनावरे दगावली आहेत.(Marathawada Rain)
अवकाळी पावसामुळे जीवितहानी
नांदेड जिल्ह्यातील वरवट गावाजवळील एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. ढगफुटीसदृश्य पावसामुळे आलेल्या पुरात अरुणा बळवंत शकिरगे (३५), तिची मुलगी दुर्गा (८) आणि भाची समीक्षा यांचा मृत्यू झाला.
शेतातून परतत असताना तिघीही पुराच्या लाटांना बळी पडल्या. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले, मात्र दुर्दैवाने हानी टळू शकले नाही.
पावसाचा जिल्हानिहाय आढावा
विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार, सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिव जिल्ह्यात झाली असून, २३०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर लातूर (२०६.५ मिमी), बीड (१८१.२ मिमी), जालना (१५७.४ मिमी), छत्रपती संभाजीनगर (१४९.४ मिमी) हे जिल्हे आहेत. नांदेड, परभणी आणि हिंगोलीमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला आहे.
जिल्हा | पावसाचे प्रमाण (मिमी) |
---|---|
धाराशिव | २३०.९ |
लातूर | २०६.५ |
बीड | १८१.२ |
जालना | १५७.४ |
छत्रपती संभाजीनगर | १४९.४ |
हिंगोली | ११०.७ |
नांदेड | ११०.५ |
परभणी | १०४.३ |
शेतीचे नुकसान आणि चिंता
या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. फळबागा, भाजीपाला व उडीद, मूग यासारख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यंदा मे महिन्याच्या प्रारंभी शेती मशागतीची कामे सुरू होणे अपेक्षित होते, मात्र अवकाळी पावसामुळे अद्याप ही कामे सुरुच होऊ शकलेली नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात चिखल व ओलसरपणा असल्यामुळे नांगरणी करणे शक्य होत नाही.
कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितले की, ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होईल आणि त्यानंतर १५ जूनच्या आसपास खरीप पेरणीस योग्य कालावधी मानला जातो. मात्र त्याआधी चांगले ऊन पडणे आवश्यक असते, जे सद्यस्थितीत दिसून येत नाही.
हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामान विभागा (IMD)ने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्रातील ८० टक्के भागात मान्सून दाखल होईल, असे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी सांगितले.
हे शेतकऱ्यांसाठी संमिश्र संकेत
जिथे पेरणीसाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता फायदेशीर असली, तरी वेळेपूर्वीची अतिवृष्टी नुकसानकारक ठरू शकते.
प्रशासनाकडून बचाव व मदत कार्य तत्परतेने राबविले जात आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलीस, महसूल विभाग आदींच्या संयुक्त पथकांद्वारे आपत्तीग्रस्त भागात मदतकार्य सुरू आहे. पीडितांना तातडीने आर्थिक मदत, अन्नधान्य, आणि निवारा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे मराठवाडा अडचणीत सापडला आहे. एकीकडे पाणीटंचाईमुळे होणाऱ्या समस्यांवर हा पाऊस काहीसा दिलासा वाटतोय, तर दुसरीकडे त्याने शेतकरी आणि सामान्य नागरिकांची कोंडी केली आहे. प्रशासन, हवामान विभाग आणि कृषी क्षेत्र यांच्यातील समन्वय आणि तत्पर कार्यवाही ही पुढील संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे.