Marathawada Crop Damage : मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने थैमान घातले. (Marathawada Crop Damage)
केळी व पपईच्या बागा आडव्या पडल्या, विजेचे १७ उपकेंद्रे बधित, आणि शेकडो वीजखांब कोसळले. शेतकरी उभ्या पिकांच्या नुकसानीने हताश, तर महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. (Marathawada Crop Damage)
सोमवारी (९ जुन) रात्री व मंगळवारी लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी पावसाने बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले. (Marathawada Crop Damage)
लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याने विजेचा खेळखंडोबा झाला. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले. (Marathawada Crop Damage)
हिंगोली जिल्ह्यात वादळामुळे केळी व पपईचे प्रचंड नुकसान झाले. पाऊस पडल्याने काही भागांत शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरु केली आहे. (Marathawada Crop Damage)
हिंगोली शहरासह परिसरात सोमवारी वादळवाऱ्यासोबत पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, काही ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू होता.
पाऊस सुरू होताच अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नाही. ९ जून रोजी वादळवारे सुटून काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर १० जून रोजी पुन्हा सायंकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.
हिंगोलीत पाऊस सुरू होताच वीजपुरवठाही खंडित झाला. परभणी शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ पाऊस झाला. वादळी वाऱ्याने कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर येथील केळीची झाडे अशी आडवी झाल्याने संपूर्ण बागेचे मोठे नुकसान झाले.
१७ वीज उपकेंद्रांना तिन्ही जिल्ह्यांत हानी
महावितरण नांदेड परिमंडळ अंतर्गत नांदेड व हिंगोली व परभणी जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे उच्च दाब व लघु दाब वाहिनीचे एकूण ४०१ विजेचे खांब झुकल्यामुळे व पडल्यामुळे एकूण १७ वीज उपकेंद्र बाधीत होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यात महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जमीनदोस्त झाले आहे. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य अभियंता राजाराम माने हे टीमसह फील्डवर उतरले होते.
कळमनुरी तालुक्यात केळी, पपईची झाडे आडवी
हिंगोली येथे वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केळी, पपई व उन्हाळी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सोमवारी रात्री वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे शेत शिवारातील झाडेही उन्मळून पडली. महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
बहुतांश ठिकाणी झाडेही उन्मळून पडली होती. हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.