Agriculture News : नैसर्गिक आणि कृत्रिम संकटामुळे खरिपात झालेले धान पिकाचे नुकसान रब्बीत धान आणि मका लागवड करून भरून काढू या आशेने जिल्ह्यातील शेतकरी जोमाने कामाला लागले. या दोन्ही पिकांसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने पीक सुद्धा जोमात आले होते. ऐन धान व मका काढणीच्या कालावधीत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदा ७०० हेक्टरवर मका लागवड करण्यात आली. सुदैवाने या पिकासाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने मक्याचे पीक सुद्धा चांगले होते. सध्या मका पिकाची कापणी आणि मळणी सुरु आहे. अनेक शेतकरी मका विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहे; पण सुरुवातीला हमीभाव केंद्र सुरु होण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांना २४०० हमीभाव असताना १७०० प्रति क्विंटलप्रमाणे मका विक्री करावा लागला.
शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर १८ मका हमीभाव केंद्रांना मंजुरी देऊन १ मे पासून खरेदीला सुरुवात झाली. या एका संकटातून मार्ग निघत नाही तोच आता मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावत असल्याने शेतातील उभे मका आडवे झाले. तर वाळत घातला मका पावसाने भिजल्यामुळे तो विकायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
अपुऱ्या उद्दिष्टाने अडचण कायम
शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला सुरुवातीला केवळ ९ लाख १७ हजार क्विंटल थान खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. रब्बीतील धान विक्रीसाठी ५० हजारावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची संख्या पाहता त्या तुलनेत दिलेले उद्दिष्ट हे कमी असून खरिपातील समस्येची रब्बीत पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बोनसची आशा पण मिळणार केव्हा
राज्य शासन धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी बोनस जाहीर करते. पण यंदा दुसरा खरीप हंगाम आला तरी शासनाने बोनस जाहीर केला नाही. मुख्यमंत्र्यांनी धान उत्पादकांना बोनस निश्चित मिळणार अशी ग्वाही दिली. पण तो केव्हा मिळणार याची तारीख सांगितली नाही त्यामुळे बोनससाठी पात्र ठरलेले दीड लाख शेतकरी अद्यापही आशेवरच आहे.
तुमचाही पीक विमा जमा झाला नाही का? पहिल्यांदा हे काम करा, तरच खात्यात जमा होईल!
