जळगाव : आजपासून पुढील तीन चार दिवस अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील (rabbi Season crops) पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांची शेतातील पीक, चारा गोळा करण्याची लगबग सुरु आहे.
यावर्षी वरुणराजाची पुरेशी कृपादृष्टी लाभल्याने गिरणा (Girana dam) व अंजनी धरण १०० टक्के पाण्याने भरले. त्यामुळे दोन्ही धरणांच्या जलसाठ्यातून शेती सिंचनासाठी आवर्तने सोडण्यात आली. त्यामुळे रब्बी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अजूनही शेतांमध्ये मका, बाजरी, ज्वारी व काही प्रमाणात गहू आदी पिके उभी आहेत. त्यातच गेल्या ३ ते ४ दिवसांपासून अवकाळीचे सावट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गुरांचा चाराही जाईल वाया
हवामान खात्याने सात दिवस पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला असल्यामुळे हाती आलेली पिके घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मका, ज्वारी, बाजरी, दादर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी असल्यामुले गुरांचा चारा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु पावसाचा अंदाज असल्यामुळे व पाऊस असल्यास शेतात कापणी करून पडलेला चारा खराब होईल. मार्च एन्डमुळे धान्य मार्केट बंद होते. त्यामुळेही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती
अनेक भागातील रब्बी हंगामातील गहू, मका, ज्वारी, दादर काढणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके कापणी करून पडली आहेत. तर काही मळणी करून पडली आहेत. चारा शेतात पाडला आहे. अचानक ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. यावर्षी परिसरात परतीचा पाऊस बऱ्यापैकी बरसल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने व जामदा डावा कालव्यास शेतीसाठी आवर्तन सुटल्यामुळे परिसरात रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती.
त्यात शेतकऱ्यांनी मका, हरबरा, ज्वारी, बाजरी, दादर पिकांची पेरणी केली आहे. हवामान बदलामुळे पिकांवर रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आले होते. यातून पिके वाचवत शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येण्याच्या तयारीत असतांना अचानक पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. पावसासह वादळ आले तर हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे तयार झालेली पिके घरात आणण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करतांना दिसत आहेत.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून आकाशात अवकाळीच्या सावटाचे ढगांची गर्दी दिसून येत आहे. जर बेमोसमी पाऊस झाला तर रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे!
- अरूण पाटील, शेतकरी, एरंडोल