राजरत्न सिरसाट
राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth), अकोला येथे एआय ३सी (कृत्रिम बुद्धिमत्ता नवोपक्रम व इन्क्युबेशन केंद्र) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.(MahaKrushi Policy)
राज्याच्या 'महाॲग्री-एआय'धोरण (MahaKrushi Policy 2025–29) अंतर्गत हे केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी शासनाने पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.(MahaKrushi Policy)
हे केंद्र विशेषतः विदर्भातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे तांत्रिक केंद्र ठरणार आहे. या माध्यमातून शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवणे, माहिती-आधारित निर्णय प्रक्रिया मजबूत करणे आणि उत्पादनक्षमता वाढविणे या उद्दिष्टांवर काम केले जाणार आहे.(MahaKrushi Policy)
शेतीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर
या इन्क्युबेशन केंद्रामार्फत विविध कृषी समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधले जाणार आहेत. त्यामध्ये विशेषतः
* पीक व्यवस्थापनासाठी एआय आधारित सल्ला
* हवामानावर आधारित कृषी सल्लागार सेवा
* कीड व रोगांचे पूर्वानुमान
* अचूक शेती (Precision Farming) तंत्रज्ञान यांसारख्या उपक्रमांवर संशोधन, नवोपक्रम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.
कृषी विद्यापीठाच्या कापूस व तेलबिया संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. संतोष गहूकर यांनी या केंद्रामुळे कृषी संशोधनाला नवीन दिशा मिळेल, अशी माहिती दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन
राज्य शासनाने राबविलेल्या 'महाॲग्री-एआय' धोरण (MahaAgri-AI Policy) अंतर्गत कृषी संशोधन, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, नावीन्यता आणि उद्योजकता केंद्र स्थापन करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
विदर्भातील शेतीला नवे तांत्रिक बळ
कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले की, या केंद्रामुळे विदर्भातील कृषी क्षेत्राला मोठे तांत्रिक बळ मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवकल्पनांच्या माध्यमातून शेतीची परिसंस्था अधिक सक्षम होईल.
याशिवाय कृषी विद्यापीठातील नावीन्यता आणि उद्योजकता केंद्रांमुळे आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि ग्रामीण युवकांसाठी कृषी-आधारित उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अकोला कृषी विद्यापीठात उभारण्यात येणारे हे कृत्रिम बुद्धिमत्ता इन्क्युबेशन केंद्र राज्यातील कृषी संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना चालना देणारे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
अधिक वाचा : Mahavistar AI App : एआय ॲप तयार, पण शेतकरी दूरच; डिजिटल शेतीचा प्रयोग अडखळला?
