नाशिक : अवकाळी पावसामुळे (Avkali Paus) तब्बल एक महिना लेट झालेल्या कांदा पिकांची काढणी सुरु आहे. सगळीकडे एकाच वेळी कांदा काढणी सुरू झाली असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काढणीसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. अशातच उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने मजूर वर्ग कांदा काढणीस चक्क नकार देत आहेत. पाहिजे तो दर देऊन ही कांदा काढणीस येणारा मजूर वर्ग ज्यादा पैसे मिळत असल्याने इतरत्र काढणीसाठी जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी Onion farmers) हैराण झाले आहे
दरवर्षाप्रमाणे यावर्षी कांद्याचे एकरी (Onion Production) उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले असून अपेक्षित उत्पादन हाती न लागल्याने शेतकरी वर्ग मुळातच नाराज आहे. उन्हामुळे कांद्याची पात गळून पडली जमीन कडक झाली. त्यामुळे कांदा काढणे मुश्किल झाले आहे. त्यातच कांदा काढणी व चाळीत निवडून टाकणे, यासाठी अलग मजूर आल्याने वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत.
कांदा काढणीचा मक्ता घेऊन ही किमान पंधरा ते वीस दिवस काढणीचे मजूर उशिरा मिळत आहे. सध्या कांद्याचे भाव कमी असल्याने हाती अपेक्षित उत्पादन मिळत नाही. योग्य भाव मिळत नसतानाच सध्या कांदा काढणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असल्यामुळे शेतकरी वर्गास चांगलीच कसरत करावी लागते आहे. एकीकडे कडक उन्हामुळे कांद्याची पात गळून पडली तर दुसरीकडे काढणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले, यामुळे कसमादे पट्टयातील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
उन्हाची तीव्रता वाढली
गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात अचानकपणे मोठी वाढ झाल्याने व उन्हाची तीव्रता वाढून तडाखा चांगलाच वाढला. त्याचा कांदा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. या उन्हाच्या तीव्रतेने कांद्याची पात अचानकपणे गळून पडली. यामुळे यंदाच्या हंगामात कांदा निघतो की नाही, याची काळजी बळीराजाला पडली आहे. उन्हामुळे कांदा काढणीच्या मजुरीत मोठी वाढ झाली. व पावसामुळे लेट लागवड झालेले कांदा पीक एकाच वेळी काढणीस आले.