नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज सिन्नर तालुक्यातील बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मंत्री महाजन यांनी चिंचोली तसेच वडगाव पिंगळा या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. चिंचोली येथे शेतकरी रमेश नागरे यांच्या कांदा पिकाची तसेच आनंदीबाई काशिनाथ कांगणे यांच्या बीट व कांदा पिकाची पाहणी केली. तर वडगाव पिंगळा येथे विठ्ठल सांगळे आणि कचरू गंधास यांच्या नुकसानग्रस्त शेती पीकांचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी मंत्री महाजन यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे,” असे आश्वासनही मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.
यावेळी गारपीटीमुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली.
