रामकिशन भंडारे
हमीभावाने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच केंद्र शासनाच्या पोर्टलने अचानक खो दिल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.(harbhara kharedi)
खरेदीची अंतिम मुदत २९ एप्रिलपर्यंत असताना, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे एसएमएस मिळालेले आणि माल घेऊन खरेदी केंद्रांवर पोहोचलेले शेतकरी अक्षरशः अडकले आहेत.(harbhara kharedi)
केंद्रांवर रांगा, शेतकऱ्यांची धावपळ
पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टर व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोजमाप झाले असले तरी बिले निघत नसल्याने पेमेंट रखडले आहे.
उन्हाच्या तडाख्यातही शेतकरी केंद्रांवर थांबून आहेत, तर वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
खरेदीची स्थिती (लातूर जिल्हा)
नोंदणीकृत शेतकरी : २८,२१२
एकूण खरेदी : ५,२१,०४० क्विंटल
खरेदी मूल्य : ३०२.७८ रुपये कोटी
वितरित रक्कम : २१७.९६ रुपये कोटी
अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीसाठी बाकी असल्याचे समोर आले आहे.
'उद्दिष्ट पूर्ण' कारण देत पोर्टल बंद
महाराष्ट्रासाठी ७.६१ लाख मेट्रिक टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत पोर्टल बंद करण्यात आले.
मात्र, प्रत्यक्षात अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी अद्याप बाकी असल्याने संताप व्यक्त होत आहे.
नोंदणी झाली, खरेदीच नाही
जिल्ह्यात फेडरेशनच्या २३ आणि पणन मंडळाच्या १०७ केंद्रांवर नोंदणी झाली होती. मात्र, त्यापैकी ७ केंद्रांवर नोंदणी करूनही खरेदीच झाली नाही. जवळपास २०० शेतकऱ्यांचा माल अजूनही अडकलेला आहे.
केंद्र चालकांची नाराजी
१५० शेतकऱ्यांची खरेदी बाकी आहे. अचानक पोर्टल बंद झाल्याने गैरसोय झाली.- जयप्रकाश पाटील (सेलू)
दीडशे टन हरभरा शिल्लक आहे. अर्धवट मोजमाप झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत.- ऋषिकेश देशमुख (गांजूर)
४० टक्के शेतकऱ्यांचा माल बाकी आहे. माप झाले तरी बिल निघत नाही.- नरेश मलवाडे (बोरी)
शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट
सध्या लग्नसराईचा हंगाम आणि खरीपपूर्व तयारी सुरू असल्याने शेतकऱ्यांना रोख पैशांची गरज आहे.
मात्र, खरेदी थांबल्याने आणि पेमेंट अडकले असल्याने त्यांची अडचण वाढली आहे. परिणामी, काही शेतकऱ्यांना कमी दरात खुल्या बाजारात हरभरा विकण्याची वेळ येऊ शकते.
उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे मोजमाप झाले आहे, त्यांना वेअरहाऊसमध्ये माल गेल्यानंतर पेमेंट दिले जाईल. सोमवारी परिस्थिती स्पष्ट होईल.- एस. व्ही. बदनाळे, उपसरव्यवस्थापक
मुदत संपण्याआधीच पोर्टल बंद केल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले असून, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे.
हे ही वाचा सविस्तर :turmeric export : शेतकऱ्यांचा अभिमान! वसमतची हळद झाली आंतरराष्ट्रीय स्टार
अधिक वाचा :Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू
