Farmer Success Story : मुरमाड व हलकी जमीन म्हणजे उत्पादनशून्य क्षेत्र, अशी सर्वसामान्य धारणा अर्जुन पाटेखेडे यांनी त्यांच्या कृतीतून खोडून काढली आहे. (Farmer Success Story)
खामगाव तालुक्यातील नायदेवी गावचा हा युवक ३५ एकर शेतीत आधुनिक विचार, तंत्रज्ञान व हंगामनिहाय पिकांच्या व्यवस्थापनातून वर्षभर नियमित उत्पन्न मिळवतोय. (Farmer Success Story)
टोमॅटो, कलिंगड, मिरची, पपई, कपाशी, सोयाबीन यांची मिश्र पीक पद्धत, सेंद्रियतेचा वापर आणि नियोजनबद्ध वेळापत्रक ही त्यांच्या यशाची सूत्रं ठरली आहेत. अर्जुन पाटेखेडे आज नव्या पिढीतील प्रेरणादायी शेतकरी ठरत आहेत.(Farmer Success Story)
जिथे इतरांना जमिनीचा पोत अडचणीचा वाटतो, तिथे अर्जुन दामोदर पाटेखेडे या प्रयोगशील युवा शेतकऱ्याने ३५ एकर मुरमाड व हलक्या जमिनीतून शेतीत समृद्धी साधत एक प्रेरणादायी उदाहरण उभे केलं आहे.
नायदेवी या छोट्याशा गावात बी.ए.चं शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ शेतीत उतरलेला हा तरुण आज वर्षभर उत्पन्न देणाऱ्या शेतीचे मॉडेल यशस्वीपणे राबवत आहे.
३.५ एकर क्षेत्रात टोमॅटो पिकाची नविन लागवड
पाटेखेडे यांचे मूळ गाव आहे. वडिलांच्या निधनानंतर बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण थांबवून त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांना आठ वर्षांचा अनुभव असून, त्यात त्यांनी सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत.
त्यांच्या ३५ एकरांपैकी २५ एकर क्षेत्र मुरमाड व हलक्या जमिनीचे असून, उर्वरित १० एकर तुलनेने जास्त उपजाऊ आहे. जमिनीच्या मर्यादा ओळखून त्यांनी पीक पद्धतीची सखोल मांडणी करत योग्य नियोजन केले आहे.
मिश्र पिकपद्धती : वर्षभर उत्पन्न
अर्जुन यांची २५ एकर जमीन मुरमाड प्रकाराची असली तरी त्यांनी ती अपयशाची कारणं न मानता पिक पद्धती, पाणी व्यवस्थापन, पीकसंरचना आणि बाजारभावाचा अभ्यास यांचा योग्य मेळ साधला.
खरिपात : कपाशी, सोयाबीन, तूर
हिवाळ्यात : कलिंगड + आंतरपीक मिरची, पपई
उन्हाळ्यात : टोमॅटो, कलिंगड (दुसरी फेरी)
पॉली मल्चिंग, ड्रिप सिंचन, मेंढी बसवणे, अवशेष व्यवस्थापन यांचा वापर
कलिंगड व मिरचीने दिला 'बॅकअप'!
कलिंगडाच्या लागवडीत वर्षभरात तीन वेळा वेगवेगळ्या हंगामात लागवड केल्याने बाजारातील दर घसरले तरी नफा टिकवता आला. एकरी १५ ते २० टन उत्पादन आणि आंतरपीक मिरचीमधून मिळालेले ६० हजार रुपयांचे उत्पन्न हे त्यांच्या विचारपूर्वक धोरणाचे यश आहे.
टोमॅटो व पपईचेही उत्तम उत्पन्न
दोन एकर टोमॅटो पीकातून २,८०० क्रेटसचा उत्पादन विक्रम
पपईच्या लागवडीला ४ वर्षांचा अनुभवातून त्यांनी १५-२५ रु./किलो दराने विक्री
बीटी कपाशी उत्पादन : एकरी १२-१५ क्विंटल
सोयाबीन : एकरी ८ क्विंटल
तूर : एकरी १० क्विंटल
सेंद्रियतेकडे झुकत शेतीचा पाया मजबूत
रासायनिक शेतीची मर्यादा ओळखून अर्जुन यांनी सेंद्रिय घटकांचा वापर सुरू केला आहे. पीक अवशेष जमिनीत मिसळणे, मेंढी बसवणे, नैसर्गिक खताचा वापर हे सर्व जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि दीर्घकालीन शेती यशासाठी अत्यावश्यक ठरत आहेत.
हे आहे 'यशाचे सूत्र'
* जमिनीचा पोत ओळखून योग्य पीक निवड
* हंगामानुसार पीक परिवर्तन
* तांत्रिक व सेंद्रिय शेतीचा संगम
* दरांचा अंदाज घेऊन उत्पादनाचे वेळापत्रक
* विविध पिकांचा समन्वय साधत धोका कमी, नफा वाढ
शेतकऱ्याच्या बहुतांश शेती मुरमाड व हलक्या प्रकारातील असल्यामुळे एकाच पिकावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे हंगामानुसार पीक परिवर्तन करत शेती केल्यास अधिक फायदेशीर ठरते. - अर्जुन दामोदर पाटेखेडे, शेतकरी