सेलू : कोरडवाहू तालुका अशी ओळख असलेल्या सेलू तालुक्यात गेल्या तीन वर्षांत फळबाग लागवडीने नवे रूप घेतले असून, तब्बल ५०० एकर क्षेत्रावर फळबागा फुलल्या आहेत. (Falbaga)
कृषी विभागाचे प्रभावी मार्गदर्शन, शंभर टक्के अनुदान आणि विविध शासकीय योजनांच्या पाठबळामुळे चालू आर्थिक वर्षातच सुमारे २०० एकरांवर नवीन फळबाग लागवड करण्यात आली आहे.(Falbaga)
तालुक्यात केळी, आंबा, पेरू, सीताफळ, चिकू, संत्रा आणि मोसंबी या फळपिकांना शेतकऱ्यांकडून विशेष पसंती दिली जात आहे. (Falbaga)
विशेषतः पेरू, संत्रा आणि मोसंबीचे क्षेत्र सर्वाधिक असून, ही फळपिके तुलनेने कमी पाण्यावर आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देत असल्याने शेतकरी त्याकडे आकर्षित होत आहेत.(Falbaga)
पारंपरिक शेतीला फाटा, शाश्वत उत्पन्नाकडे वाटचाल
कापूस व सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांमध्ये खर्च वाढत असताना आणि उत्पन्न अनिश्चित होत असताना, फळबाग लागवड हा शाश्वत आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा पर्याय ठरत आहे.
विशेषतः तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळत असून, शेतीत नवे प्रयोग करत आहेत.
आंतरपिकातूनही मिळतो हातभार
फळबाग लागवडीच्या पहिल्या तीन ते चार वर्षांत झाडे उत्पादनात येईपर्यंत आंतरपीक घेण्याची सुविधा शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे या कालावधीत होणारा खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून निघतो. यामुळे फळबाग लागवडीचा आर्थिक धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
शंभर टक्के अनुदानामुळे आत्मविश्वास
फळबाग लागवडीसाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान दिले जाते. हे अनुदान तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाते. त्यामुळे सुरुवातीचा आर्थिक भार कमी होऊन अल्प व मध्यम भूधारक शेतकरीही आत्मविश्वासाने फळबाग लागवडीकडे वळत आहेत.
मनरेगा व फुंडकर योजनेचा आधार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनांमुळे तालुक्यात फळबाग लागवडीला मोठी चालना मिळाली आहे.
रोपे, खड्डे खोदणे, ठिबक सिंचन, कुंपण यांसारख्या पूरक बाबींना आर्थिक पाठबळ मिळत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे वाढले धैर्य
मनरेगा योजनेतून खोदण्यात आलेल्या विहिरी आणि दुधना प्रकल्पाच्या कालव्यांमधून रब्बी हंगामात मिळणारे पाणी यामुळे फळपिकांसाठी आवश्यक असलेले पाण्याचे स्त्रोत उपलब्ध झाले आहेत. याचा थेट फायदा फळबाग लागवडीला होत आहे.
साडेतीन हजार हेक्टरवर फळबाग क्षेत्र
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, पूर्वी तालुक्यात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा होत्या. गेल्या तीन वर्षांत त्यात ५०० एकरांची भर पडली आहे. यामध्ये पेरूचे क्षेत्र सर्वाधिक असून, त्याखालोखाल संत्रा आणि मोसंबीचा क्रम लागतो.
फळबाग लागवडीमुळे सेलू तालुक्यातील शेतीला नवी दिशा मिळत असून, भविष्यात हा तालुका फळपिकांच्या उत्पादनासाठी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करून अमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे.- गुलाब शिंदे, तालुका कृषी अधिकारी
