Citrus Fruit Management : बदलत्या हवामानामुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादकांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. (Citrus Fruit Management)
तापमानातील सतत होणारी चढ-उतार, वाढती उष्णता आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे मोठ्या प्रमाणावर फूलगळ व फळगळ होत असल्याचे चित्र दिसत आहे.(Citrus Fruit Management)
विशेषतः आंबिया बहरातील फळांवर याचा गंभीर परिणाम होत असून उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(Citrus Fruit Management)
बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ५ हजार हेक्टरांवर संत्र्यांची लागवड असून अलीकडच्या काळात क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, सध्याच्या हवामान बदलामुळे उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंबिया बहर धोक्यात
संत्रा व मोसंबीला प्रामुख्याने मृग आणि आंबिया असे दोन बहर येतात. आंबिया बहरात झाडांवर सुमारे ३० हजारांपर्यंत फुले येतात, परंतु त्यापैकी केवळ ४ टक्के फळेच टिकतात.
मृग बहरात फुलांची संख्या कमी असली तरी फळ टिकण्याचे प्रमाण ५ ते ५.५ टक्क्यांपर्यंत असते. सध्याच्या वातावरणीय बदलांमुळे हे प्रमाण आणखी घटत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तापमानातील तफावत ठरते घातक
फेब्रुवारी-मार्चमध्ये फळधारणा झाल्यानंतर अचानक तापमानात वाढ होते. दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री थंडावा यामुळे झाडांवर ताण येतो. एप्रिलमधील उष्ण लाटेमुळे कोवळी फळे गळून पडण्याचे प्रमाण वाढते.
पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन
फळधारणेनंतर झाडांना नियमित व संतुलित पाणी आवश्यक असते.
पाण्याची कमतरता असल्यास फळगळ वाढते
जास्त पाणी साचल्यास मुळांना इजा होते
अति ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगांना आमंत्रण मिळते
यामुळे पाण्याचे अचूक नियोजन करणे अत्यावश्यक ठरते.
अन्नद्रव्यांचा अभावही कारणीभूत
तज्ज्ञांच्या मते, केवळ पाणी देऊन उत्पादन टिकत नाही.
जमिनीत चुना व जस्ताचे प्रमाण कमी असल्यास फळ टिकण्याची क्षमता घटते
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव असल्यास झाडे ताण सहन करू शकत नाहीत
नैसर्गिक संजीवकांच्या कमतरतेमुळे झाड फळे गळून टाकते
बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव
हवामानातील बदल आणि अति ओलावा यामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. झाडांवरील सुकलेल्या फांद्या (सल) वेळेवर न काढल्यास रोगाचा प्रसार अधिक वेगाने होतो.
उपाययोजना काय?
कृषी तज्ज्ञांनी पुढील उपाय सुचवले आहेत
* बागेचे योग्य व वेळेवर व्यवस्थापन करावे
* बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी
* सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढवावा
* पाण्याचा निचरा होईल, याची काळजी घ्यावी
* सुकलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात
* फुलांची संख्या जास्त असल्यास योग्य नियोजन करावे
बदलत्या हवामानामुळे संत्रा व मोसंबी उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. योग्य व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचा संतुलित वापर आणि पाण्याचे नियोजन केल्यास फूलगळ व फळगळ काही प्रमाणात नियंत्रणात आणता येऊ शकते. अन्यथा उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
अधिक वाचा : Tur Harbhara Market : तूर-हरभरा मार्केट अपडेट ; 'या' बाजारात दरात उसळी, कुठे घसरले भाव?
