Agriculture News : जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजाला स्वतःच्या पोटाला चिमटा घेत प्रसंगी मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला कवडीमोल दरात विकायची वेळ आल्यावर कपाळावर हात मारून घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. सद्यस्थितीत अनेक भाजीपाल्यांचे दर (Vegetable Market) खाली आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
अशीच काहीशी कोबी उत्पादक (Cabbage Farmer) शेतकऱ्यांवर वेळ आली असून कोबी सध्या ५० पैसे किलोने विकला जात असल्याने येवला तालुक्यातील विखरणी येथील गोरख शेलार या शेतकऱ्याने कोबीच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडून शेतकऱ्याला पिळणाऱ्या व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव (Vegetable Market Down) मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाचे पाऊल उचलले आहे.
पीक झाले भुईसपाट
कवडीमोल भावाने शेतीमाल घेतला जात असल्याने पिकात जनावरे सोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्चही शेतीमालातून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतातील पीक काढण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा ते जनावरांच्या तोंडी घातलेले बरे पवित्रा घेतलेला आहे. नंतर आता कांद्यापाठोपाठ कोबी पिकात जनावरे सोडून कोबीचे पीक भुईसपाट करण्यात आले आहे.
मालाला बाजारभाव नाही
गेल्या काही दिवसांपासून कांदा, वांगे आणि इतर भाजीपाल्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळेच शेतकरी बहारदार पिकावर कधी ट्रॅक्टर फिरवतात, कधी उभ्या पिकात जनावरे सोडतात.