Avakali Rain : मे महिन्यातच मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने दमदार हजेरी लावलेल्या मराठवाड्यावर (Marathwada) पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल दोन हजार गावांमध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळाले आहे.
पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि आता तर अतिवृष्टीने तब्बल दोन हजार गावांमध्ये कहर माजवला आहे. घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू, शेतीचे नुकसान आणि वाहतुकीवर परिणाम या साऱ्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. केवळ २४ तासांत बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील १५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
धाराशिवला अवकाळीचा पुन्हा तडाखा
गुरुवारी (२९ मे) रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रीच्या सुमारास जोर धरला. धाराशिव जिल्ह्यात १२ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड, शेतीची हानी आणि नदी-नाल्यांचे पूरस्थितीत रूपांतर झाले.
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारातील पाझर तलाव फुटला, सिंचन विहिरी गाळाने भरल्या. लोहारा तालुक्यातील जेवळी गावातील बेन्नीतुरा नदीवरील बंधारा फुटल्याने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली.
जनजीवन विस्कळीत
* जालना जिल्ह्यात बेथलम येथील म्हैस वीज पडून मृत्यूमुखी पडली.
* नसडगाव येथे दोन शेळ्यांचा मृत्यू.
* भोकरदन तालुक्यात घराची भिंत कोसळली
* सोयगाव देवी येथे विहीर खचली.
* भूम तालुक्यातील ईट गावातील बाजारपेठेत पाणी घुसल्याने २० व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान.
* भांडगावजवळ पूल वाहून गेल्याने भूम-बार्शी-माणकेश्वर मार्ग बंद झाला.
तलाव कोरडे, पावसाचा लाभ नाही!
हिंगोली, परभणी, आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला असला तरी तलावांतील पाणीसाठ्यात कोणताही लक्षणीय वाढ झालेली नाही.
* या तिन्ही जिल्ह्यांतील १४२ पैकी केवळ २ तलाव १००% भरलेले आहेत.
* ५६ तलाव अजूनही कोरडे, पाण्याची टंचाई कायम आहे.
* सध्या एकूण उपयुक्त पाणीसाठा ३९.१२% इतकाच आहे.
बारा मंडळांमध्ये अतिवृष्ट
मंडळाचे नाव | पाऊस (मिमीमध्ये) |
मांजरसुंबा (बीड) | ७५.२५ |
चौसाळा | ६७.७५ |
धारूर | ६५.७५ |
धाराशिव ग्रा. | ६५.७५ |
सालगरा | ६७.०० |
जवळा | ७३.५० |
माणकेश्वर | ७३.५० |
भूम | ६७.७५ |
लेट | ७७.७५ |
इटकूर | ७५.५० |
मोहा | ६५.७५ |
डाळिंब | ६५.५० |
मुरुम | ६५.५० |
लोहारा | ६७.०० |
जेवळी | ६५.५० |
हे ही वाचा सविस्तर :Avakali Paus: पावसाने फक्त माती नाही ओल केली, तर स्वप्नंही भिजवली! वाचा सविस्तर