मंगळवेढा: पावसाळा म्हटले की हिरवीगार झाडी, निसर्ग, डोंगरदऱ्या, धबधबे, जिकडे पाहावे तिकडे हिरवागार शेती, असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
या उलट पावसाळ्यात उगवणाऱ्या कडवंची या नैसर्गिक, सेंद्रिय रानभाजीला ठरावीक खाऊ ग्राहक, ज्येष्ठ नागरिक खूप महत्त्व देतात.
शेतात उगवलेल्या भाज्या शेतमजूर, शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी, रस्त्यावर किंवा आठवड्याच्या बाजारात विकण्यासाठी येतो. याच पावसाळ्याचा फायदा खाऊ ग्राहक घेतो.
इतर वेळेस ती भाजी शोधूनही भेटत नाही; पण काही भाज्या अशा असतात की जुलै ते सप्टेंबर अखेर ही कडवंचीची रानभाजी मिळते. या रानभाज्या खरीप हंगामापर्यंत येतात.
रब्बी हंगाम पेरणीनंतर या भाज्या दुर्मीळ होतात. त्यानंतर शेतकरी रानातील तण काढून टाकतो. त्यात अशा भाज्याही नष्ट होतात. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असणाऱ्या शिवारात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कडवंचीची रानभाजी मिळते.
येथे सर्वसामान्य हातावरचे पोट असणाऱ्या गरीब महिलांना रोजगार मिळवून देते. या महिला ही कडवंचीची भाजी काळ्या शिवारातून सकाळी तोडून सायंकाळी बाजारात विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या कडवंचीच्या भाजीला मागणी वाढली आहे.
भाजी गोळा करण्यासाठी शेतात भटकंती◼️ कडवंचीची भाजी गोळा करण्यासाठी किमान चार ते पाच किलोमीटर शेतात महिलांना फिरावे लागते.◼️ आता या भाजीला मागणी खूप आहे.◼️ ही येथील काळ्या शिवारातील सर्रास भुसभुशीत, कोरड्या, कसदार जमिनीत पिकते.◼️ या नैसर्गिक भाजीला खाऊ ग्राहकांची मागणी वाढल्याने अधिक महत्त्व आले आहे.
कडवंचीच्या भाजीचे अनेक फायदे आहेत. ही भाजी भूक वाढवते, अपचन, गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. नैसर्गिकरीत्या ही भाजी उगवते. त्या-त्या हंगामात या रानभाज्या शरीराला फायदेशीर ठरतात. - डॉ. नितीन चौंडे, मंगळवेढा
अधिक वाचा: पाणंद शेतरस्ते आता कायमस्वरूपी रेकॉर्डवर येणार; भुमी अभिलेख विभागाने घेतला 'हा' निर्णय?