रत्नागिरी : हवामानावर आधारित असणाऱ्या फळपीक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चत्तम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो.
परंतु, कंपन्यांच्या चुकीच्या निकषामुळे हंगाम संपून एक महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप विमा परतावा मिळालेला नाही.
फळपीक विमा परताव्यासाठी कंपन्यांकडून जे निकष लागू केले आहेत, त्यामध्ये दि. १५ मेपर्यंतच होणारे नुकसान ग्राह्य धरले जाते. यावर्षी दि. ८ मे पासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा, काजू पीक झाडावर असताना झालेले नुकसान विमा कंपन्या ग्राह्य धरणार का? असा प्रश्न केला जात आहे.
यावर्षी दि. ८ मे पासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दि. २० मे पासून सलग सर्वाधिक पाऊस पडला. यादरम्यान अनेक बागायतदारांचा आंबा झाडावर होता. या आंब्याला वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा फटका बसला. त्यामुळे बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले. याची दखल कंपन्यांकडून घेत बागायतदारांना परतावा देणे अपेक्षित आहे.
५० टक्के शेतकरी सहभागी होत नाही
सुरुवातीला दि. ३० मेपर्यंत झालेले नुकसान ग्राह्य धरले जात होते. सन २०२१ साली विमा कंपन्यांनी निकष बदलले व दि. १५ मे पर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात आहे. वास्तविक दि. ७ जूनपर्यंत आंबा हंगाम असतो.
ज्यावेळी झाडावर आंबा असतो, त्यावेळी होणारे नुकसान ग्राह्य धरण्याऐवजी १५ दिवस आधीच मुदत दिली आहे. परिणामी चुकीच्या निकषामुळे विमा काढूनही बागायतदारांना प्रत्यक्ष लाभ होत नसल्यामुळे ५० टक्के बागायतदार फळपीक विमा योजनेत सहभागी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
सन २०२५ च्या हंगामातील स्थिती
आंबा पीक
सहभागी बागायतदार - ३०,१३२
क्षेत्र - १४,३८३.५०४७८
शेतकरी हप्ता - १९,५६,१५,६६४.१
राज्य शासन - ५,०१,२६,५१३.६
केंद्र शासन - ३०,५६,४९,४७०.४
काजू पीक
सहभागी बागायदार - ६,३३३
क्षेत्र - ३,६३५.९९८६७
शेतकरी हप्ता -२१,८१,१५,९९२.०२
राज्य शासन - ३,०५,४२,३८८.४८
केंद्र शासन - ३,०५,४२,३८८.४८
एकूण आकडेवारी
सहभागी बागायदार - ३६,४६५
क्षेत्र - १८,०१९.५०३४५
शेतकरी हप्ता - २१,७४,३१,६५६.१
राज्य शासन - ५३,१८,०७,५२४.८
केंद्र शासन - ३३,६१,९१,८५८.९