अरुण बारसकरसोलापूर : पीक विमा नुकसान भरपाईचे ट्रिगर (निकष) व उंबरठा उत्पादनाची अट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मारक ठरली आहे.
मागील खरीप हंगामात १५३ कोटी जमा करुन घेणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अवघे ४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे सोयाबीन हे पीक तर भरवशाच्या म्हशीला टोणगा ठरले आहे.
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षीच खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. जसे खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे, तसे पीक विमा क्षेत्रातही वाढ होत आहे.
एक रुपयात पीक विमा भरण्याची संधी राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, यामध्ये गडबडी झाल्याने शासनाने मागील वर्षी ही महत्त्वाकांक्षी योजना रद्द केली.
आगाऊ रक्कम मोजावी लागली तरी पीक विमा भरण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे मागील वर्षी खरीप हंगामात दिसून आले.
पीक विमा भरण्यासाठी लाखाने शेतकरी पुढे आले असले तरी नुकसान भरपाई हजाराच्या पटीत मिळत आहे. खरीप पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी उंबरठा उत्पादन मारक ठरत आहे.
याशिवाय पीक विमा नुकसान भरपाईचे पाच पैकी चार ट्रिगर (निकष) रद्द करून उत्पादनावर आधारित नुकसान भरपाईचा एकच निकष ठेवल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे विमा कंपनीचे मात्र भले झाले असल्याचे दिसत आहे.
तीन लाख शेतकऱ्यांनी अडीच लाख हेक्टरचा विमा भरला◼️ खरीप २०२५ साठी जिल्ह्यातील ३ लाख ३९ हजार ७६५ शेतकऱ्यांनी दोन लाख ५२ हजार ५४८ हेक्टर क्षेत्राचा विमा भरणा केला होता. शेतकरी व शासनाने १५३ कोटी १९ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते.◼️ जिल्ह्याचा सरासरी पाऊस ४८१ मि.मी. असताना मागील वर्षी प्रत्यक्षात एकूण ६८९.५ मि.मी. म्हणजे १४३ टक्के इतका पाऊस पडला होता.◼️ जवळपास दीडशे टक्के पाऊस पडल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा पीक विम्याची अधिक नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा होती.◼️ पीक विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांना ४१ कोटी रुपये मंजूर झाले असून, काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगण्यात आले.◼️ जिल्ह्यात एक लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. जवळपास सर्वच क्षेत्राचा विमा भरला होता. मात्र, नरखेड मंडळातील ५ हजार ५७८ शेतकऱ्यांना दोन कोटी ७८ लाख रुपये मंजूर झाले.
पीक विमा नुकसान भरपाईसाठी अगोदर पाच ट्रिगर (निकष) होते. त्यातील चार निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वीप्रमाणे पाच निकषांवर विमा नुकसान भरपाई मिळायला हवी. तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. - विष्णू भोसले, शेतकरी, गुळवंची
अधिक वाचा: दोडक्यातून मिळाली समृद्धी; २० गुंठ्यात साडेतीन लाखाच्या उत्पन्नाची पांडुरंगरावांची प्रेरणादायी कहाणी
Web Summary : Farmers in Solapur struggle to get crop insurance due to stringent trigger and threshold production criteria. Despite paying premiums, compensation is minimal, benefiting insurance companies more than farmers facing significant crop losses.
Web Summary : सोलापुर में किसान सख्त ट्रिगर और सीमा उत्पादन मानदंडों के कारण फसल बीमा प्राप्त करने के लिए संघर्ष कर रहे हैं। प्रीमियम का भुगतान करने के बावजूद, मुआवजा बहुत कम है, जिससे किसानों की तुलना में बीमा कंपनियों को अधिक लाभ हो रहा है।