नवी दिल्ली: पश्चिम आशियातील युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि घसरत चाललेला रुपया यामुळे केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे.
बुधवारी सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आणखी भडकणार आहेत.
आता सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे सुमारे २७ हजार रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज सराफा उद्योगाने व्यक्त केला आहे.
भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलनसाठ्चावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
त्यातच कच्च्या तेलाच्या आयात बिलात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे 'अनावश्यक आयात' कमी करून डॉलरची बचत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आयात कमी होत नाही; सोने महागते
◼️ सोन्यावरील आयात शुल्क वाढवून आयात नियंत्रणात येत नाही, उलट देशांतर्गत बाजारातील दर आणखी वाढतात, असा दावा रत्न व दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेकडून करण्यात आला.
◼️ भांडवलावर मोठा ताण निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना बसणार आहे.
ग्राहक सोने खरेदी करतील का?
◼️ सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे दागिन्यांच्या विक्रीत १० ते १५ टक्क्यांची घट होऊ शकते.
◼️ ग्राहक आता वजनाने हलक्या दागिन्यांकडे वळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर बाजारात तस्करी वाढण्याची भीती उद्योगातून व्यक्त होत आहे
सोन्याची आयात किती वाढली?
◼️ २०२५-२६ - ७१.९८
◼️ २०२४-२५ - ५७.९
(आयात अब्ज डॉलरमध्ये)
आयात शुल्क किती वाढले? आधी | आता
◼️ सोने-चांदी | ६% | १५%
◼️ प्लॅटिनम | ६.४% | १५.४%
◼️ प्रभावी कर ९.१८% | १८.४५%
सोने तस्करीचे मार्ग कोणते?
◼️ जमिनीमार्गे - ५५.९०%
◼️ हवाईमार्गे - ४३.७०%
◼️ समुद्रीमार्गे - ०.५०%
उद्योगासमोर चिंता काय?
◼️ अखिल भारतीय रत्न व दागिने परिषदेनुसार, शुल्कवाढीमुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील व त्याचा फटका ग्राहकांसह सूक्ष्म उद्योगांनाही बसेल.
◼️ उच्च आयात शुल्कामुळे पुन्हा सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका असल्याचे उद्योगाने म्हटले आहे.
◼️ महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाने सीमांवरील देखरेख वाढविण्याची तयारी सुरू केली आहे.
◼️ भारताच्या पूर्व आणि ईशान्य सीमांवर, विशेषतः म्यानमार, बांगलादेश, चीन आणि नेपाळलगतच्या दुर्गम भागांचा वापर करून जमिनीमार्गे होणारी सोन्याची तस्करी मोठे आव्हान ठरत आहे.
◼️ ईशान्येकडील आसाम, मणिपूर आणि मिझोराम ही राज्ये तस्करीची प्रमुख मार्गिका बनली आहेत.
सोन्याची जप्ती
◼️ २५४ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २६० किलो सोने गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान विमानतळे आणि बंदरांवर जप्त करण्यात आले आहे.
◼️ २,६०० किलो सोने २०२४-२५ मध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले असून, ५३३ जणांना अटक केली आहे.
अधिक वाचा: खरीपातील १४ पिकांच्या किमान आधारभूत किमतींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; वाचा किती झाली वाढ?
