सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील सांगली जिल्ह्याच्या मणदूर (ता. शिराळा) परिसरात अलीकडे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेकडो एकर शेती पडीक राहिली आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन असुरक्षित बनले आहे.
जंगलात या पार्श्वभूमीवर, वन्यजीवांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष करण्यासाठी ग्रामस्थांनी थेट पाहणी व्याघ्र प्रकल्पाच्या 'कोअर' व 'बफर' क्षेत्रात प्रवेशाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन येथील चांदोली वन्यक्षेत्रपालांकडे दिले आहे.
ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जंगलात पाण्याचे साठे, भक्ष्य उपलब्धता व अन्य सुविधा केल्याचा दावा वनविभागाकडून केला जात असताना, वन्यप्राणी गावाकडे का येत आहेत? कामांच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे प्रत्यक्ष पाहणीचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या कामांची तांत्रिक व प्रशासकीय पाहणी करण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष समिती स्थापन केली आहे.
सिव्हिल इंजिनिअर कामांच्या तांत्रिक गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी. वकील कायदेशीर बाबींवरील मार्गदर्शनासाठी, पत्रकार व पदाधिकारी पारदर्शकता राखण्यासाठी, लोकप्रतिनिधी, आजी-माजी सरपंच व निवडक ग्रामस्थांचा सहभाग आहे.
"ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी वनविभागाने आम्हाला पाहणीची परवानगी द्यावी. वन्यजीव पुन्हा जंगलातच कसे राहतील, यासाठी केलेल्या उपाययोजनांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे," अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
"सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेली अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्याचा फटका शिराळा व शाहूवाडी तालुक्याला बसत आहे. कोअर व बफर क्षेत्रात प्रवेश न दिल्याने तज्ज्ञांची समिती नेमली आहे." - वसंत पाटील, माजी सरपंच, मणदूर.
