Join us

राज्यात १९९ साखर कारखान्यांनी किती केले ऊस गाळप? किती साखर उत्पादन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:42 IST

Us Galap 2024-25 ऊस क्षेत्र घटल्याने संपूर्ण जिल्ह्यातील साखर हंगाम रेंगाळले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांची प्रतिदिन दीड लाखांहून अधिक गाळप क्षमता असताना मागील ३४ दिवसांत अवघे ३७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे.

अरुण बारसकर सोलापूर : ऊस क्षेत्र घटल्याने संपूर्ण जिल्ह्यातील साखर हंगाम रेंगाळले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांची प्रतिदिन दीड लाखांहून अधिक गाळप क्षमता असताना मागील ३४ दिवसांत अवघे ३७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे.

साधारण एक कोटी मेट्रिक टनांवर यंदाचा हंगाम आटोपेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. १५ नोव्हेंबर ते आजपर्यंत अवघे ८५ लाख मेट्रिक टन गाळप झाले.

जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या जरी ४० असली तरी उसाचे क्षेत्र पुरेसे असेल त्यावेळी ३८ साखर कारखाने सुरू होऊ शकतात.

दोन साखर कारखाने सुरू होण्यासारखी परिस्थिती नाही. यंदा ३२ साखर कारखाने सुरू झाले होते. मात्र, चार-पाच साखर कारखाने जेमतेम काही दिवस सुरू झाले व बंदही झाले.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांची प्रतिदिन एक लाख ५५ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता होती, तर जानेवारीअखेरला प्रतिदिन एक लाख ५८ हजार मेट्रिक टन क्षमतेचे ३२ साखर कारखाने सुरू होते.

३०-३२ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालले तर एका दिवसाला पावणेदोन लाख मेट्रिक टन गाळप होते. मात्र, यंदाच्या जानेवारी महिन्यात ३२ दिवसांत अवघे ३४ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. बरेच साखर कारखाने उसाअभावी तीन-चार तास व त्यापेक्षा अधिक काही तास चालतात. त्यामुळे ऊस गाळप रेंगाळत सुरू आहे.

● २ फेब्रुवारीच्या साखर आयुक्तांच्या गाळप तक्त्त्यावरून सोलापूर जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांचे ८५ लाख १८ हजार मेट्रिक टन गाळप व ६९ लाख ५८ हजार क्विंटल साखर तयार झाली. साखर उतारा ८.१७ टक्के इतका पडला आहे.● कोल्हापूर जिल्ह्यात २६ लाख गाळपातून एक कोटी ६१ लाख क्विंटल, तर साखर उतारा ११.०५ टक्के इतका पडला आहे.● पुणे जिल्ह्यात ७७ लाख मेट्रिक टन गाळपातून ६९ लाख क्विंटल साखर तयार झाली, तर ८.९८ टक्के इतका साखर उतारा पडला आहे.● राज्यात १९९ साखर कारखान्यांचे ६३५ लाख मेट्रिक टन गाळप व ५७६ लाख क्विंटल साखर तयार झाली. राज्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा ९.०७ टक्के इतका पडला आहे.

मागील वर्षी पाऊस कमी असल्याने उसाची नवीन लागवड झाली नव्हती. खोडव्यावरच गाळप सुरू आहे. यंदा पाऊस चांगला पडल्याने लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस तोडला आहे. १० फेब्रुवारीपर्यंत सोलापूर व धाराशिवचे बहुतेक कारखाने बंद होतील. - प्रकाश अष्टेकर, सहसंचालक, सोलापूर प्रादेशिक विभाग

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीमहाराष्ट्रसोलापूरपुणे