सोलापूर : मी फळपीक विमा आज भरतो असे कोणी शेतकरी म्हणाला तर ते फार्मर आयडीशिवाय शक्य नाही. हवामान आधारित फळपीक विमा उतरविण्यासाठी आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सातत्याने बदलत असलेले हवामान लक्षात घेता फळपीक विम्यात शेतकरी सहभागी होणे आवश्यक आहे. मृग बहार पीक विमा भरण्यासाठी कृषी विभागाने पोर्टल सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना विमा भरण्याची सुविधा आता सहज उपलब्ध झाली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी नंबर देण्यात येत आहेत. हा विशिष्ट नंबर म्हणजे आधारकार्ड नंबरइतकाच महत्त्वाचा आहे. आता शेतीविषयक प्रत्येक बाबींसाठी फार्मर आयडी मागितला जात आहे.
फळपीक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक आहे. म्हणजे सातबारा, आधार नंबर तितकाच फार्मर आयडीही तितकाच महत्त्वाचा आहे.
डाळिंब, पेरू, लिंब, चिक्कू, मोसंबी, सीताफळ या फळबागांना विम्याचे कवच आहे. सातबारा व आठ-अ उतारा, जिओ टॅग फोटो, फार्मर आयडी, आधार कार्ड व बँक पासबुक ही कागदपत्र सोबत द्यावी लागणार आहेत.
कोणत्या पिकांना विमा कवच
- डाळिंबसाठी आठ, लिंबुसाठी चार तर इतर फळपिकांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये हेक्टरी शेतकरी हिस्सा, त्यामध्ये केंद्र व राज्य शासन हिस्सा विमा कंपनीला जमा करते.
- त्यावर नुकसानभरपाई डाळिंब एक लाख ६० हजार, पेरू ७० हजार, लिंबू ८० हजार, चिक्कू व सीताफळ प्रत्येकी ७० हजार तर मोसंबी एक लाख रुपये मिळू शकते.
- पाऊस कमी किंवा अधिक पडल्याने फळपिकांचे नुकसान झाले तर विम्याची नुकसानभरपाई मिळू शकते.
सोलापूर जिल्हात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षीच नव्याने फळबागांची लागवड होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागांचे नुकसान होऊ शकते. अशा वेळी विमा कंपनीकडून नुकसानभरपाई दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी फळ पीकविमा भरणे आवश्यक आहे. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अधिक वाचा: मर, मुळकुज व खोडकुज या रोगांवर जालीम उपाय, करा ह्या बुरशीचा वापर