वर्षभर उत्पादन देणारे आणि कमी कालावधीत हमखास उत्पन्न मिळवून देणारे कलमी वांगे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
अवघ्या ५५ ते ६० दिवसांत काढणीला येणारे हे पीक, सुधारित जाती व योग्य व्यवस्थापनामुळे चांगला दर मिळवून देत आहे.
उन्हाळ्यात कमी पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारेही या पिकाचे यशस्वी प्रयोग होत असून वांग्याचा दर शंभर रुपयांपर्यंत जाऊन आला आहे.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विकसित करण्यात आलेल्या भरघोस उत्पादन देणाऱ्या कलमी वांग्याच्या रोपांना दरमहा ७० ते ८० हजारांची मागणी नोंदविली जात आहे.
उरुळी कांचन, यवत, हडपसर परिसरातून मोठ्या प्रमाणात मागणी येत असून रोपांसाठी दोन ते तीन महिन्यांचे 'वेटिंग' सुरू आहे.
गावठी वांग्याचे 'क्रॉस' करून तयार केलेले हे कलमी रोप बुरशीजन्य रोगांना कमी बळी पडते. त्यामुळे पारंपरिक वांग्याच्या तुलनेत ३० ते ४० टक्के अधिक उत्पादन मिळते.
सलग दोन वर्षे उत्पादन देण्याची क्षमता या पिकात असून योग्य व्यवस्थापन केल्यास १२ महिने काढणी घेता येते, अशी माहिती नर्सरी व्यवस्थापक विजय मदने यांनी दिली.
लग्नसराई, आषाढी वारी, श्रावण महिन्यात वांग्याला विशेष मागणी असते. एकरी सुमारे १३०० ते १४०० रोपे आठ बाय चार फूट अंतरावर लागवड केली जातात. ठिबक सिंचनामुळे कमी पाण्यात हे पीक चांगले येते.
पारंपारिक वांग्याच्या तुलनेत ४० टक्के अधिक उत्पादन मिळते. सलग दोन वर्षे उत्पादन देण्याची क्षमता कलमी वांगी या पिकात असून योग्य व्यवस्थापन केल्यास १२ महिने काढणी घेता येते.
भाजीपाला शेतीला मिळू लागले नवे बळ
◼️ शेणखत, कुजलेले शेणखत, गांडूळखत तसेच रासायनिक व जैविक खतांचा संतुलित वापर केल्यास जमीन सुपीक राहते.
◼️ ठिबकद्वारे जीवाणू व जीवामृत वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो आणि पिकाला नैसर्गिक व अनैसर्गिक ताण सहन करण्याची क्षमता मिळते. कलमी वांग्याची चवही चांगली असल्याने बाजारात त्याला अधिक मागणी आहे.
◼️ दरम्यान, लडकतवाडी उंडवडी (ता. दौंड) येथील शेतकरी आकाश होले यांनी गेल्या चार-पाच वर्षांपासून अडीच एकर क्षेत्रात १२ महिने कलमी वांग्याचे उत्पादन घेतले आहे.
◼️ वर्षभरात सरासरी ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पोल्ट्री खत, शेणखत, जैविक खतांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे पीक अधिक फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
◼️ कलमी वांग्याच्या वाढत्या मागणीमुळे बारामती परिसरात भाजीपाला शेतीला नवे बळ मिळत असून शेतकऱ्यांसाठी हे पीक हमखास उत्पन्नाचा पर्याय ठरत आहे.
अधिक वाचा: राज्यातील रोपवाटिकाधारकांना महावितरणने दिला झटका; ३२ महिन्यांची सबसिडी परत घेणार
