अवसरी : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन ३१०० देण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
गळीत हंगाम सन २०२५-२६ चे धोरण ठरविण्यासाठी २५ सप्टेंबर २०२५ झालेल्या मंत्री समितीच्या धोरणानुसार मागील हंगामाचे सरासरी १२ टक्के साखर उताऱ्यानुसार निव्वळ एफआरपी ३२७२.१४ प्रती मे टन येत आहे.
निधीच्या उपलब्धतेनुसार पहिल्या हप्त्यापोटी ३१०० रुपये प्र.मे. टन पंधरवडा बिलाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे.
ऐच्छिक पद्धतीने वसुली
◼️ उर्वरित रक्कम रु. १७२.१४ प्र.मे. टन देखील निधी उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
◼️ दरवर्षी ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून विविध कार्यकारी सोसायटीची वसुली सक्तीने करण्यात येत असे.
◼️ तथापि शासनाचे शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांच्या विनंतीनुसार वसुली सक्तीची न करता संमतीपत्र घेऊन ऐच्छिक पद्धतीने करणेबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णय घेतला आहे.
◼️ त्यामुळे ऊस पेमेंट मधून सोसायटी कर्जाची कपात करावी किंवा नाही याबाबत संबंधितांनी सोसायटी व बँकेस कळविणे आवश्यक आहे.
◼️ तरी ऊस उत्पादकांनी आपला उत्पादित केलेला ऊस कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.
अधिक वाचा: ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका
