Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची उसाची बिलं मिळण्याचा मार्ग मोकळा; राज्यातील 'या' कारखान्यांना एनसीडीसीकडून कर्ज मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:13 IST

राज्यातील या कारखान्याना राष्ट्रीय सह. विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) ११४ कोटींचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून शेतकऱ्यांची ऊसबिले (एफआरपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीचे (अजित पवार) घड्याळ हातात बांधल्याचा फायदा राहुल पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील भोगावती कारखान्याला झाला.

या कारखान्यास राष्ट्रीय सह. विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) ११४ कोटींचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून शेतकऱ्यांची ऊस बिले (एफआरपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

'वारणा' व 'बिद्री'लाही या कर्जमंजुरीचा लाभ झाला आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने विरोधी पक्षात राहून मदत होणार नाही, असे वाटल्याने राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.

नंतर तातडीने मदत होईल असे वाटले होते. परंतु, प्रत्यक्षात मदत मिळायला विलंब झाला. शासनाने आर्थिक अडचणीत असलेल्या १४ कारखान्यांचे प्रस्ताव मदतीसाठी महामंडळाकडे पाठविले होते, त्यांतील सात कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर झाले.

त्यात 'भोगावती' सह जिल्ह्यातील तीन कारखान्यांचा समावेश आहे. 'बिद्री'लाही कर्जाची रक्कम उपलब्ध झाली आहे. 'भोगावती'ने या हंगामात गाळप केलेल्या ४.३२ लाख टनपैकी १६ ते ३१ डिसेंबर २०२५ अखेरचीच एफआरपी दिली.

नंतरची सुमारे ८० कोटींची बिले थकीत आहेत. त्यामुळे महामंडळाकडून मंजूर कर्जाची रक्कम जिल्हा बँकेकडे भरावी लागेल. त्यातून बँकेचे कर्ज भागवून बँक कारखान्यास वाढवून कर्ज मंजूर करील व त्यातून ही बिले भागवली जातील.

काही दिवसांत ही बिले शेतकऱ्यांना मिळतील, असे कारखाना प्रशासनाने सांगितले. कामगारांचा तीन महिन्यांपासून पगार नाही. त्यांचे सुमारे ३८ कोटी थकीत आहेत.

साखर तारण देऊन घेता येईल असे कर्ज उपलब्ध नाही; त्यामुळे एफआरपी कशी भागवायची, असा पेच होता. त्यातून मार्ग निघाला आहे. सहकार महामंडळाने दिलेल्या कर्जाची परतफेड दोन वर्षांनंतर होते. त्याची मुदत किमान सात वर्षे असते.

कुणाला किती कर्ज मिळाले?◼️ दूधगंगा-वेदगंगा, बिद्री : २६१ कोटी ८० लाख◼️ तात्यासाहेब कोरे, वारणानगर : १६० कोटी◼️ भोगावती कारखाना : ११४ कोटी

'भोगावती'स कर्ज का मिळाले..?◼️ कारखान्याने गळीत हंगाम घेतला.◼️ एफआरपी थकीत नाही.◼️ राजकीय पाठबळ.◼️ ताळेबंद उणे नेटवर्थमध्ये नसल्याचे दाखवण्यात यश.

राष्ट्रीय सहकारी महामंडळाकडून कारखान्यास कर्ज मंजूर झाले असून, त्यातून शेतकऱ्यांची ऊस बिले प्राधान्याने भागविण्याचा प्रयत्न आहे. - सागर पाटील, कार्यकारी संचालक, भोगावती साखर कारखाना, परिते

अधिक वाचा: यंदा पीक कर्ज मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; वाचा कोणत्या पिकाला एकरी किती मिळणार कर्ज?

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers' sugarcane bill path cleared; NCDC loan approved for factories.

Web Summary : Sugarcane farmers will soon receive payments as NCDC approves loans for sugar factories, including Bhogavati, Warana, and Bidri. Bhogavati received ₹114 crore. The funds will clear pending dues to farmers and workers.
टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीबँककेंद्र सरकारराज्य सरकारसरकारकोल्हापूरअजित पवार