मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या पुगाव, मुठवली बुद्रुक व खांब गाव आदी परिसरात कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती केली जाते.
हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेतीमधून शेतकऱ्यांना हुकमी पीक व उत्पन्न मिळते. मात्र, पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सध्या येथे पाण्यानेभरलेल्या शेतात भात कापणीची व झोडणीची कामे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची उन्हाळी भात शेतीच्या कामांची लगबग सुरु होती. टपोऱ्या भाताच्या लोंब्या डोलू लागल्या होत्या. त्यामुळे हाती भरघोस पीक लागणार या आशेने शेतकरी सुखावले होते. अनेकांनी १० मेनंतर भात कापणीचे नियोजन सुद्धा केले होते.
मात्र ऐनवेळी अवकाळी पावसाने घात केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले. शेतामध्ये पाणी साचले आहे. नाईलाजाने भिजलेला भात शेतकऱ्यांना कापावा लागत आहे. या भाताला भाव देखील मिळणार नाही. तसेच भिजल्याने पेंड्याला देखील भाव मिळणार नाही.
मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. हाती आलेले भात पीक पूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे ते खराब झाले आहे. त्याला भाव देखील मिळणार नाही. तब्बल २५ ते ३० हजारांचे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी. - चंद्रकांत यशवंत येळकर, शेतकरी, पुगाव.