नाशिक : रविवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने १ हजार १५२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तब्बल ४८२.७० हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांची नासाडी झाली आहे. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अवकाळीने झोडपले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला तालुक्यांमधील गावांमध्ये शनिवारी अवकाळी वादळी पावसासह गारपिटीचाही तडाखा बसला. यामुळे कांदा, मका, गहू, भाजीपाला आदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पेरू आणि डाळिंबाच्या फळबागांनाही धोका निर्माण झाला आहे.
अवकाळीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून, १९५ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच २८ हेक्टरवरील कांदा रोपवाटिकांचेही पावसासह वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे. तसेच १२२ हेक्टरवरील गहू आणि तब्बल ८० हेक्टरवरील भाजीपाला शेतपिकांची नासाडी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अवकाळीचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर आले असून हवामान बदलाचा हा फटका जिल्ह्यातील शेतीला बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, तातडीने कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येऊन सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बाधित तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी केली आहे.
सोमवारीही झोडपले
सोमवारीही शहरासह जिल्ह्यात दुपारी अवकाळी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार बागलाण, देवळा, लोहणेर, निफाड, सिन्नर, मालेगाव या तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. बागलाणमध्ये गारपिटीचाही तडाखा बसला आहे.
आजही असणार सावट !
जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून मंगळवारी ऑरेंज तसेच बुधवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस अवकाळीचे संकट कायम असून, सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस काही तालुक्यांमध्ये हजेरी लावू शकतो, यामुळे शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
