अनिरुद्ध पाटील
बोर्डी : गेल्या मृग बहारातील प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेतील चिकू विमा शंभर टक्के फळला होता; परंतु त्याची माहिती गतवर्षीच शेतकऱ्यांना देण्यासह त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित होते.
मात्र, विलंब होत असल्याने पालघरच्या चिकू बागायतदारांच्या विविध संस्था आणि त्यांच्या शिष्टमंडळांना सरकार दरबारी लढावे लागले.
अखेर दीर्घ कालावधीनंतर विम्याची रक्कम बँक खात्यात जमा होत आहे, त्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विम्याचा शेतकरी हिश्श्यातील १८ हजारांची वाढ, तसेच विमा रक्कम उशिरा मिळाल्याचा मुद्दा 'लोकमत'ने सातत्याने मांडल्याचा शेतकऱ्यांनी आवर्जून उल्लेख केला.
प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेत मृग बहाराचा संरक्षित कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर असून, ३० जूनपर्यंत विमा रक्कम भरली जाते.
नाराजी होती, पण..
२०२१ ते २३ या तीन वर्षात चिकू विम्याचा प्रतिहेक्टरी शेतकरी हिस्सा १८ हजार रुपये केल्याने शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली. गतवर्षी हा हिस्सा साडेतीन हजार रुपये केल्याने प्रतिसाद मिळाला; परंतु २०२५ उजाडला तरी माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
जिल्ह्यात प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची वाढ हा मुद्दा अधिवेशनात मांडला. गतवर्षी शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी साडेतीन हजार करण्यात आला. त्यानंतर विमा रक्कम मिळण्यासाठी वाचा फोडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. - विनोद निकोले, आमदार
शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असून, विमा रक्कम मंजूर होऊन नियोजित वेळेत मिळावी यामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. - यज्ञेश सावे, कृषिभूषण
अधिक वाचा: शेतजमिन वाटणीपत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर