अगोदर साखर आता कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे उसाचे बिल महिनोनमहिने थांबवून अडवणूक केली जात होती. आता कारखानदारांकडून उसाची बिले बँकेत पाठवली जात आहेत, पण बँकांकडून तुटवड्याचे कारण देऊन पैसे देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका आणि मतदारसंघात तीन साखर कारखाने मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करतात. कारखानदारांकडून सुरुवातीला वेळेवर उसाची बिले दिली जातात. उसाची बिले कारखानदारांनी पंधरा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.
परंतु कारखाने बंद होऊन दीड ते दोन महिने झाले असताना अनेक शेतकऱ्यांना अद्याप बिले मिळाली नाहीत. तर काहींच्या खात्यात उसाची बिले येत आहेत.
अनेक शेतकऱ्यांच्या उसाची बिले विविध बँकांमध्ये जमा होत असताना, बँकांकडून पैसे नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत.
चेस्ट बँक परळीत हलवल्यामुळे बँका परेशान
येथील चेस्ट बँक, जी पूर्वीची एसबीएच व सध्याची एसबीआय येथे होती. तिथे सर्व बँकांचे पैसे ठेवण्यात येत होते आणि गरज पडल्यास तत्काळ काढणे शक्य होते. परंतु आता ही बँक माजलगावला न ठेवता परळीत हलवल्यामुळे येथील बँकांना पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी परळीत जावे लागत आहे.
बँकांना पैसे आणण्यासाठी वाहनाचा खर्च वाढला आहे, आणि वाहनात पैसे आणतानाही सुरक्षेशी संबंधित कारणे पुढे करत बँका कमी पैसे आणताना दिसून येतात.
त्यामुळे बँकांकडून व्यापारी आणि शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी परळीत गेलेली चेस्ट बँक माजलगावला आणावी अशी मागणी होत आहे.
ऑनलाइन व्यवहार करा
बँकेकडे रोख उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही शेतकरी व व्यापाऱ्यांना जशी कॅश उपलब्ध होईल तशी कॅश देत आहोत. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी ऑनलाइन व्यवहार केल्यास त्यांना कितीही व्यवहार करता येईल, त्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहार करावा. - तात्यासाहेब शेंडगे, शाखाधिकारी पूर्णवादी नागरिक सहकारी बँक माजलगाव.
