राज्याच्या जवळपास सर्व बाजारांमध्ये सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून परिणामी, बाजारातील दर मंदावले आहेत. विशेषतः कोथिंबीर आणि मेथी या पालेभाज्यांचा दर कमी झाला आहे.
ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. मेथी आणि कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना सध्या तोट्यात बाजारात विक्री करणे भाग पडत आहे. तसेच वाहतुकीचा खर्च आणि इतर अडचणीही त्यांना भेडसावत आहेत.
या परिस्थितीवर एका शेतकऱ्याने आपल्या कल्पकतेचा उपयोग करून एक नवा आणि यशस्वी मार्ग शोधला आहे. त्याने मेथीच्या जुडीला पन्नास रुपयांच्या उत्पन्नात रूपांतरित करण्याचे एक साधे पण प्रभावी गणित मांडले आहे. हे गणित सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून इतर शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओमधील शेतकऱ्याचे यशस्वी गणित
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेतकरी सांगतो की सध्या बाजारात मेथीचे दर अत्यंत कमी झाले आहेत. जर शेतकऱ्याने वाहतुकीचे खर्च आणि इतर खर्च समाविष्ट करून बाजारात मेथी विकली तर त्यात कोणताही मोठा फायदा होणार नाही. म्हणूनच त्याने एक पर्यायी मार्ग निवडला आहे. तो मार्ग आहे कोंबड्यांना मेथी खायला देणे.
त्यानुसार शेतकऱ्याने आपल्या चार कोंबड्यांना मेथीची एक जुडी खायला दिली आणि त्यातून त्याला चार अंडी मिळतील. पुढे या अंड्यांना बाजारात १२ रुपये प्रति अंडी या दराने विकले असता. शेतकऱ्याला अंड्यापासून अर्थात एका मेथीच्या जुडीपासून ४८ रुपये उत्पन्न मिळाले.
शेतीला जोड व्यवसायाची जोड; शेतकऱ्यांचा सशक्त मार्ग
• व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे की शेतीला जोड व्यवसायाची जोड देणे हे आर्थिक दृषटिकोनातून फार फायदेशीर ठरू शकते.
• मेथी उत्पादक शेतकऱ्याने दाखवलेले हे उदाहरण म्हणजे शेतीला योग्य नियोजन व विविध पद्धतीने जोड व्यवसायाची मोठी गरज आहे.
• शेतकऱ्यांना फक्त पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता त्याचसोबत पशुपालन, कुक्कुट पालन किंवा इतर छोट्या व्यवसायांचा विचार करणे आवश्यक आहे.
• या प्रकारे शेतकऱ्याला आपल्या मुख्य उत्पन्न स्रोताबरोबरच, त्याला पूरक उत्पन्न देखील मिळू शकते.
चांगल्या नियोजनामुळे शेतीतील नफा दुप्पट होऊ शकतो
या प्रकारचे यशस्वी प्रयोग हे दर्शवतात की योग्य नियोजन, कल्पकता आणि विविधता हेच शेतकऱ्याला भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीपासून वाचवू शकतात. जेव्हा बाजारात विक्रीचे दर कमी असतात तेव्हा शेतकऱ्यांना दुसरे पर्याय शोधणे गरजेचे ठरते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि नवा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो.
