Pune : शेतकऱ्यांच्या दारात जास्तीत जास्त दूध देणाऱ्या शुद्ध देशी जातीच्या गाईंचा जन्म व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन भ्रूणप्रात्यारोपण करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील परिंचे आणि आजूबाजूच्या गावामध्ये ही प्रक्रिया पार पडली असून यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च आलेला नाही.
जनावरांमध्ये भ्रूणप्रात्यारोपण करणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खर्चिक बाब असून यासाठी शेतकरी पुढाकार घेत नाहीत. पण राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून २५ हजार रूपयांमध्ये भ्रूणप्रात्यारोपण प्रक्रियेतून कन्फर्म गर्भधारणा करून दिली जाते. पण देशी गोवंशाला महाराष्ट्रात चालना मिळावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालय पुणेच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने पशुसंवर्धन विभागासोबत सामंजस्य करार केला असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भ्रूणप्रात्यारोपण करून दिले जात आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर राज्यातील देशी गोवंश संवर्धन कार्यक्रमाला नवे बळ मिळाले असून या कराराच्या अंमलबजावणीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यांतर्गत १६ निवडक गायींमध्ये उच्च जनुकीय क्षमतेच्या सहिवाल जातीचे भ्रूण यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यात प्रती वेत ३००० लिटरपेक्षा अधिक दूध देण्याची क्षमता असलेल्या उच्च वंशावळीच्या सहिवाल, गीर, राठी व महाराष्ट्रातील डांगी व खिल्लार गायी शेतकऱ्यांच्या बांधावर तयार होणार आहेत. या उपक्रमामुळे परिसरात देशी गोवंश संवर्धन, जनुकीय सुधारणा आणि दूध उत्पादनवाढीस मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा प्रकल्प राज्याच्या देशी गाय संवर्धन विकासासाठी महत्वाचा ठरत असून दुसऱ्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. तसेच संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ डॉ. शितलकुमार मुकणे आणि प्रकल्प समन्वयक डॉ. विष्णु नरवडे यांचे सातत्यपूर्ण वैज्ञानिक मार्गदर्शन प्रकल्पाला लाभत असून तांत्रिक अंमलबजावणी अधिक बळकट होत आहे. प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व भ्रूण प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विष्णु जवने यांच्या मार्गदर्शनाखालील तज्ज्ञ पथकाने २५ फेब्रुवारी रोजी मौजे परींचे गावात प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन भ्रूण प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
यावेळी डॉ. अस्मिता सताळकर, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती पुरंदर, डॉ. अर्चना जगताप (पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय चिकित्सालय परिंचे), रविराज ताकवले, (पशुचिकित्सालय राजेवाडी) हे उपस्थित होते. परिंचे येथील पशुपालक अरविंद गेनबा गुळंबे, हिम्मतराव गोविंदराव जाधव, रामचंद्र माधवराव सूर्यवंशी तसेच हरगुडे येथील सुशील बाळकृष्ण ताकवले, सचिन कोंडीबा ताकवले, भूषण रवींद्र ताकवले, संतोष दत्तात्रय ताकवले, किशोर मुकुंद यादव व सूर्यकांत मालोजीराव ताकवले यांच्या गायींमद्धे मध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले.
या संयुक्त उपक्रमामुळे महाराष्ट्रात देशी गोवंश संवर्धन, जनुकीय सुधारणा व दूध उत्पादन वाढीस मोठी चालना मिळणार असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी व्यक्त केला.
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून देशी गाय संवर्धन काळाची गरज - डॉ. विलास खर्चे (कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)
देशातील शुद्ध देशी गाईंची संख्या कमी होत असल्यामुळे लिंग वर्गीकृत वीर्य व आधुनिक प्रजानामद्धे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून जातिवंत देशी गायी तयार करणे ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून देशी गोवंश संवर्धन, दूध उत्पादन वाढ आणि नैसर्गिक शेतीला बळकटी देणे हे शाश्वत ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे असे मत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले.
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय?
थोडक्यात सांगायचे झाले तर उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरित्या (OPU) स्त्रीबीज मिळवून त्याचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलितांडांची (Potential Zygotes) ७ दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता (Recepient) गाईमध्ये प्रस्थापित करुन त्यांची वाढ करणे व त्यापासून वासरु मिळवणे.
