सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र विरोधाचा सामना करावा लागलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात अखेर मोठा बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने जनभावनेचा आदर करत नवीन मार्ग निश्चित केला आहे. या नव्या बदलामुळे सावंतवाडी तालुक्यातील निसर्गसंपन्न आंबोली परिसरातील ८ गावे वगळण्यात आली आहेत. आता हा महामार्ग दोडामार्गे बांद्याला जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे अंतर अवघ्या ८ तासांवर येणार आहे.
फेब्रुवारी २०२४ च्या मूळ आराखड्यात अनेक त्रुटी आणि पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. विशेषतः गेळे ते डेगवे दरम्यानचा ३० किमीचा प्रस्तावित बोगदा आणि बागायती जमिनी बाधित होणार असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आता सुधारित आराखड्यानुसार महामार्गाची लांबी ८०२ वरून ८५६.७६५ किमी झाली असून, तो १३ जिल्हे आणि ४० तालुक्यांमधून जाणार आहे.
दुर्गम भागाचा होणार 'कायापालट'
◼️ हा महामार्ग आता आजरा-चंदगड-दोडामार्ग मार्गे थेट बांद्याला जोडला जाईल.
◼️ यामुळे आतापर्यंत विकासापासून दूर असलेल्या या दुर्गम भागाला थेट द्रुतगती मार्गाची जोड मिळणार आहे.
◼️ यामुळे वाहतूक, व्यापार आणि विशेषतः पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
'पत्रादेवी' नावावर टीकास्त्र!
◼️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा 'ड्रिम प्रोजेक्ट' असला तरी गोव्यातील 'पत्रादेवी' या नावावरून सुरुवातीपासूनच वादाची ठिणगी पडली होती.
◼️ या नावावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने, आता महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील या नावामध्ये बदल करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
पर्यावरणाची चिंता कायम!
◼️ आराखडा बदलला असला तरी पर्यावरणाचा पेच अद्याप सुटलेला नाही.
◼️ नव्या मार्गातील कोलझर, तळकट, झोळंबे, पडवे आणि माजगाव ही गावे 'इको-सेंसिटिव्ह झोन' म्हणून ओळखली जातात.
◼️ या भागातून महामार्ग नेताना निसर्गाची हानी टाळण्याचे मोठे आव्हान रस्ते विकास महामंडळासमोर असेल.
कोणत्या गावांना फुटली 'लॉटरी'?
◼️ सावंतवाडी तालुका : केगद, डेगवे, बांदा, पडवे आणि माजगाव या गावांचा नव्याने समावेश.
◼️ दोडामार्ग तालुका : कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे ही पाच गावे आता महामार्गाच्या कक्षेत.
◼️ वगळलेली गावे : गेले, आंबोली, वेर्ले, पारपोली, फणसवडे, असनिये, तांबोळी आणि फुकेरी.
अधिक वाचा: 'शक्तिपीठ' महामार्गाच्या सुधारित आराखड्याला सरकारची मंजुरी; आता 'हे' नवीन तालुके जोडणार
