मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सन २०२५-२६च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गळीतास आलेल्या उसाला प्रति मे. टन ३ हजार दर देण्यात येणार आहे.
यामध्ये २,८००चा पहिला हप्ता तत्काळ व दिवाळीला २०० अतिरिक्त रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
पहिल्या हप्त्याची रक्कम १ ते १५ नोव्हेंबर तसेच १६ ते ३० नोव्हेंबर या दोन्ही पंधरवड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित बँका व पतसंस्थांकडे थेट वर्ग केली आहे.
उपपदार्थ निर्मितीचा कोणताही प्रकल्प नसतानाही काटकसरीचे धोरण राबवून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी संचालक मंडळाने हा दर देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी खरात यांनी सांगितले की, चालू हंगामात आजअखेर ५४ दिवसांत १,५५,०२० मे. टन ऊस गाळप झाले असून १,३९,४०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
आजचा साखर उतारा १०.२४ टक्के, तर सरासरी उतारा ९.०४ टक्के आहे. सध्या गाळपासाठी प्रामुख्याने ०२६५ जातीचा ऊस येत आहे.
कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी ऊस बिले, कामगारांचे वेतन तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेत अदा केली जात असल्याचे सांगितले.
उपपदार्थांमधून उत्पन्नाचे साधन नसतानाही शेतकऱ्यांच्या विश्वासावर दामाजी कारखाना उभा आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि समाधानकारक दर देणे हीच आमची प्राथमिकता असून, म्हणूनच यंदा २,८०० पहिला हप्ता व दिवाळीला २०० असा एकूण ३,००० दर देण्याचा निर्णय घेतला आहे. - शिवानंद पाटील, चेअरमन, दामाजी शुगर
अधिक वाचा: यंदाच्या गाळप हंगामात ११ टक्केचा साखर उतारा ठेवत 'ह्या' साखर कारखान्याने मारली बाजी
