वाशिम जिल्ह्याच्या गायवळ (ता. कारंजा) परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत धरणावरील तब्बल २० मोटारपंपांच्या तांब्याच्या तारांची रात्रीतून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, १६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तारांची चोरी झाल्याने गावातील पाणीपुरवठा तसेच पिकांच्या सिंचनावरही गंभीर परिणाम झाला आहे.
धरणातून पाणी उपसा करण्यासाठी लावण्यात आलेल्या मोटारपंपांच्या तांब्याच्या तारांना अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केले. सकाळच्या सुमारास मोटारपंप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी पाहणी केली असता मोटारपंपांच्या ताराच चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या चोरीमुळे गावातील पाणीपुरवठ्यासह शेतीचे सिंचन पूर्णतः ठप्प झाले असून, नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू असतानाच पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गायवळ धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी होत असताना रात्रीच्या वेळी कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे.
तांब्याच्या वाढत्या दरामुळे मोटारपंपांच्या तारांची चोरी वाढत असल्याचे चित्र असून, दोषींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या चोरीमुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम झाला आहे. दरम्यान, वृत्त लिहेपर्यंत संबंधितप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
