सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये आता थेट काजू खरेदी केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या सभागृहात विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे चेअरमन, सचिव आणि काजू कारखानदारांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मनीष दळवी बोलत होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होत असून, खरेदी-विक्रीची भक्कम साखळी उभी करण्यासाठी सहकाराचा हा पर्याय निवडण्यात आला आहे.
यामुळे मध्यस्थांची साखळी तुटून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे चेअरमन, सचिव तसेच काजू कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.
प्रक्रिया उद्योजकांशी चर्चा
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १६ मार्च रोजी जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योगधारकांबरोबर स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर खरेदी प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जवळपास ४६ विविध सोसायट्यांनी स्वारस्य दाखवले असून, सुरुवातीला २७ संस्थांनी संमती दिली आहे.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावातच काजू खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ मिळेल. शेतकऱ्यांनी आपला माल या केंद्रांवर विक्रीस देऊन सहकार्य करावे. - मनीष दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष.
हेही वाचा : शिंगाडा प्रक्रिया उद्योग : बेरोजगार तरुण, महिला तथा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी
