पुणे जिल्ह्याच्या दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२ टक्के साखर उतारा घेऊन १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता केली. हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बैंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, आनंदराव शिंदे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, चिफ अकाउंटंट राजेश वाकचौरे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, पर्चेस ऑफिसर ब्रिजेश लोहोट, ऊसपुरवठा अधिकारी दिनकर आदक, सहा. ऊसविकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे तसेच ऊस वाहतूकदार, ऊसतोड मुकादम, ऊसतोडणी मजूर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी अधिक माहिती देताना चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनाने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातून नोंद असलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करून ११ लाख ३८ हजार ४९६ मे.टन उसाचे गाळप करुन सरासरी १२ टक्के साखर उतारा घेऊन १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन केले असून, गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
जास्तीत जास्त वाहतूक करणाऱ्यांचा सन्मान
ट्रकने जास्तीत जास्त वाहतूक करणारे वाहतूकदार निशा किशोर घाडगे, ट्रॅक्टरने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार विलास चिमाजी गाडगे, ट्रॅक्टर जोडने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान चुनीलाल नवल पवार, टायर बैलगाडीने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान अजिनाथ मारुती सकुंडे, जास्तीत जास्त ऊसतोड करणारे कंत्राटदार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
३ कोटी ६५ लाख ४५ हजार युनिट महावितरणला निर्यात
• सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे आजअखेर ७ कोटी ३४ लाख ७३ हजार युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता ३ कोटी ६५ लाख ४५ हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. तसेच २० के.एल. पी.डी. डिस्टिलरी प्रकल्प दि. ०१ डिसेंबरपासून चालू झाला असून, आजअखेर १ कोटी ०९ लाख ५० हजार बल्क लिटर रेक्टिफायर स्पिरीटचे उत्पादन झाले असून, २१ लाख ८१ हजार बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, सहवीज निर्मिती व डिस्टिलरी प्रकल्प चालू आहे. गाळप हंगाम यशस्वी पार पाडल्याबद्दल व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी आभार मानले.
• गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ट्रकने जास्तीत जास्त वाहतूक करणारे वाहतूकदार निशा किशोर घाडगे, ट्रॅक्टरने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार विलास चिमाजी गाडगे, ट्रॅक्टर जोडने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान चुनीलाल नवल पवार, टायर बैलगाडीने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान अजिनाथ मारुती सकुंडे, जास्तीत जास्त ऊसतोड करणारे कंत्राटदार विलास चिमाजी गाडगे, हार्वेस्टर मशीनने जास्तीत जास्त ऊसतोडणी करणारे कंत्राटदार अनिता राजेंद्र सरवदे व वाहतूकदार प्रणय संजय दरेकर यांचा सांगता समारंभानिमित्त सत्कार करण्यात आला.