वैभव साळकर
कधीकाळी सुपीकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्याच्या परिसराला कधी नसलेला हत्तींचा अधिवास म्हणून गोंडस नाव देण्याचा जो प्रयत्न काही तथाकथित प्राणिमित्रांमधून सोशल मीडियावर सुरू आहे. ही हत्तीग्रामची चाहूल असल्याची एकच चर्चा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात सुरू आहे. भविष्यात तिलारी खोऱ्यात हत्तीग्राम साकारण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आतापासूनच तयार करण्याचा डाव तर नाही ना? अशी शंकेची पाल हत्तीबाधित शेतकऱ्यांमध्ये चुकचुकू लागली आहे.
पूर्वी हत्ती म्हटला की कुतूहल वाटायचे. लहान मुलेच काय, अगदी मोठी माणसेही रस्त्याने जाणाऱ्या हत्तीला पाहण्यासाठी गर्दी करायची; पण सन २००२ नंतर मात्र याच गजराजांचे रौद्ररूप पाहिल्यावर त्यांच्याप्रती असलेले कुतूहल नाहीसे झाले आणि त्यांच्याबद्दलची असलेली आपुलकी तिरस्कारात बदलली.
सन २००२ मध्ये कर्नाटकातील दांडेली भागातून सडामार्गे हत्तींनी मांगेलीत प्रवेश केला. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा या भागात हजेरी लावली, तेव्हा त्यांच्या पावलांची इथल्या भोळ्याभाबड्या कोकणी माणसाने लक्ष्मीची पावले समजून पूजा केली. मात्र, याच हत्तींनी त्यांच्या रोजीरोटीवर पाय ठेवला. दिवसरात्र भातशेती आणि बागायतीत धडगूस घालायचा आणि ही शेती पायदळी तुडवत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान करायचे, हा हत्तींचा नित्यक्रम बनला होता. पुढे हे हत्ती तिलारी खोऱ्यात येऊन स्थिरावले.
बाबरवाडी, हेवाळे, मुळस, विजघर, कुडासे, भिकेकोनाळ, कळणे, आदी गावांत त्यांनी अतोनात नुकसान केले. अनेकांचा जीवही गेला; पण २४ वर्षांपूर्वी अवतरलेले हत्तींचे भूत मात्र आजही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे, जे उतरायचे नाव घेत नाही. सन २०१५ मध्ये हत्तीपकड मोहीम राबविली; पण त्यानंतरही हत्तींचे येणे काही थांबले नाही. आताही हत्तींचा कळप तिलारी खोऱ्यात हैदोस घालतच आहे; पण गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आला आहे तो याच कळपातील ओंकार हत्ती...!
प्राणिमित्रांकडून ओंकारला पकडू नये यासाठी प्रयत्न
काही प्राणिमित्र ओंकारला पकडू नये यासाठी प्रयत्न करताहेत तर शेतकरी हत्तीपकड मोहीम झालीच पाहिजे यासाठी आग्रही आहेत. मात्र या संघर्षात कधी नसलेला अधिवास तयार करून तथाकथित प्राणिमित्रांच्या माध्यमातून हत्तींसाठी हत्तीग्राम उभारण्याचा हा प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना? अशी शंका आता हत्तीबाधितांमधून उपस्थित केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी गोवा आणि सावंतवाडीतील गावात शिरकाव
या टस्कराने मोर्लेतील शेतकऱ्यांचा बळी घेतला आणि तो चर्चेत आला; पण ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे त्याला पकडण्याचा अध्यादेश निघाला. या टस्कराला अधूनमधून कळप सोडून फिरण्याची सवय लागली आहे. त्यामुळे तो अनेकदा मध्येच आक्रमक बनतो. परिणामी पाळीव जनावरांवरही तो हल्ला चढवतो. काही महिन्यांपूर्वी त्याने गोवा आणि सावंतवाडी तालुक्यातील काही गावांत शिरकाव केला आणि पुन्हा तो माघारी परतला.
तिलारी खोऱ्यात सोडण्याची मागणी
या मध्यंतरीच्या काळात त्याला त्याच्या अधिवासात म्हणजे तिलारी खोऱ्यात सोडा, अशी आभासी मागणी होऊ लागली; पण मुळात तिलारी खोरे खरेच हत्तींचा अधिवास आहे का ? आणि जर आहे तर मग हत्ती बुडीत क्षेत्राबाहेर न थांबता पुनः पुन्हा लोकवस्तीच्या ठिकाणी का येतात? या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नाहीत.
