कोल्हापूर : हलकर्णी येथील अथर्व दौलत कारखान्याची एफआरफी थकीत नसून, ती १०० टक्के पूर्ण अदा केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी दिली.
अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. संचलित दौलत साखर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम २४ फेब्रुवारीपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
यंदा कारखान्याने एकूण ४ लाख ४८ हजार २७१ मेट्रिक टन ऊस गाळप करून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.
कारखान्याने गेल्या सात हंगामापासून जपलेली ऊस बिलांची देयके वेळेवर अदा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
हंगाम अखेरीस १ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गाळप झालेल्या ८१,३३६.०५५ मेट्रिक टन उसाचे बिल रुपये ३४०० प्रतिटनप्रमाणे देय होते.
त्यानुसार एकूण २७ कोटी ६५ लाख ४२ हजार ५८७ इतकी रक्कम २३ मार्च २०२६ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत.
केवळ नजरचुकीने थकीत एफआरपी असलेल्या यादीत कारखान्याच्या नावाचा समावेश झाला असल्याचेही मराठे यांनी सांगितले.
अधिक वाचा: अखंड पाच महिने क्रशिंग करून 'या' कारखान्याने ऊस गाळपात रचला नवा उच्चांक
